शिवसेनेचा भाजपला घरचा आहेर
मुंबई : ‘अब की बार 220 के पार’ अशी घोषणा देऊन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपसाठी मतदारांनी चांगलाच धक्का दिला. निकालात भाजप आणि शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षाही कमी जागा मिळाल्या आहेत. निकालावरुन महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपवर थेट टीका न करता आपल्या धोरणात बदल करण्याचा सूचक इशाराही दिला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेला सत्तेचा उतमात मान्य नव्हता आणि नाही. महाराष्ट्राच्या भावना दडपून कोणाला पुढे जाता येत नाही. मराठी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो, असे म्हणत फार शहाणपणा करु नका. उतू नका, मातू नका. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा, असाच जनादेश आला आहे. हा महाजनादेश नव्हे तर हा फक्त जनादेश आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावर भाष्य केले आहे. आपल्या लेखात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक करत भाजपला जमिनीवर येण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या सभांचाही उल्लेख त्यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार उदयनराजे यांच्यावरही टीका करण्यात आली.