गोंदवले – सातारा जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी आणि मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील लढतीत माजी आमदार जयकुमार गोरे यांनी 3043 मतांच्या निसटत्या आघाडीने बाजी मारत एकवटलेल्या विरोधकांना अस्मान दाखवले. “आमचं ठरलंय’ या सर्वपक्षीय टीममधील माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे प्रयत्न अपुरे पडले तर शेखर गोरेंना शिवधनुष्य पेलवले नाही. जयकुमार गोरेंच्या विजयानंतर माण आणि खटाव तालुक्यांमधील गावोगावच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली.
माण-खटाव मतदारसंघात कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जयकुमार गोरे, सर्वपक्षीय टीमचे प्रभाकर देशमुख आणि शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यात तिरंगी लढत झाली. मतदारसंघातील जयकुमार गोरेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी शेखर गोरे गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी अगदी शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म मिळवला. दुसरीकडे “गोरे बंधू हटाव’ अशी गर्जना करत मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी एकत्र आले होते. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर “आमचं ठरलंय’ टीमने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरविले. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
मनी, मसल पॉवरचा वारेमाप वापर करण्यात आला. जातीय राजकारणाचा हुकमी पत्ताही शेवटच्या टप्प्यात बाहेर काढण्यात आला. निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा अवलंब करण्यात आला. दहिवडी येथे आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून जयकुमार गोरेंनी आघाडी घेतली. माण तालुक्यातील 15 फेऱ्यांमध्ये जयकुमार गोरेंनी 13,637 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी खटाव तालुक्यातील मतमोजणीच्या उर्वरित फेऱ्यांमध्ये भरुन काढण्याचा विश्वास प्रभाकर देशमुख समर्थक व्यक्त करत होते. वीस फेऱ्यानंतर जयकुमार गोरेंची आघाडी कमी करण्यात त्यांना यशही आले. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या लढतीत जयकुमार गोरेंनी 3043 मतांनी बाजी मारली. जयकुमार गोरे यांना 91,469, प्रभाकर देशमुख यांना 88,426 तर शेखर गोरे यांना 37539 मते मिळाली.
विरोधकांचा डाव हाणून पाडला
सर्वच पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचले होते. कॉंग्रेस, फलटणचे राजे, बारामतीची राष्ट्रवादी, रासप आणि माझ्याच पक्षातील काहींनी मला रोखण्यासाठी सापळा लावला होता. भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा माझ्या विरोधात लावला गेला. जातीपातीचे राजकारण खेळले गेले. मात्र, माण-खटावच्या जनतेने एकवटलेल्या विरोधकांचा डाव हाणून पाडला, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.