विजय शेंडगे
भारत कवितके यांनी अनेक प्रकारची छोटीमोठी कामे केली. अखेरीस एका रुग्णालयात नोकरीला लागले. पदोन्नती मिळवत शस्त्रक्रियागार सहायक या पदापर्यंत झेप घेतली. कविता, चारोळी, स्तंभकार या माध्यमातून लिहीत राहिले. शब्दांवर प्रेम करत राहिले. शब्दांचा भंडारा उधळत राहिले. व्यक्त होणं ही माणसाची गरज असते. लेखणी, वक्तृत्व, रंग, शिल्पं, अश्रू, स्पर्श, चेहऱ्यावरील हावभाव असे व्यक्त होण्याचे अनेक मार्ग असतात. कवितके शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होत राहिले. या व्यक्त होण्याच्या जाणिवेतूनच त्यांचं “आयुष्य उसवताना’ हे आत्मकथन आकाराला आलं आहे.
आत्मचरित्र म्हणजे ज्याच्या त्याच्या आयुष्याचं सिंहावलोकन असतं. आपणच आपल्या आयुष्याला आरसा दाखवून केलेलं निरीक्षण असतं. पूर्वीच्या पिढ्यांनी खूप सोसलं आहे. ज्यांना शब्दांतून व्यक्त होता येतं त्यांना हे सोसणं मांडावंसं वाटतं. आजकालच्या तरुण पिढीने पूर्वाश्रमींच्या मान्यवर लेखकांची आत्मकथनं वाचली तर आयुष्य किती खडतर असतं याची त्यांना जाणीव होईल. कवितके यांनी जे सोसलं ते या आत्मकथनात मांडलं आहे.
गुरांच्या बाजारात शेण गोळा करून ते विकून पैसे मिळवणे, लिमलेटच्या गोळ्या विकणे, भिकाऱ्यांच्या रांगेत झोपून काढलेल्या रात्री, शालेय जीवनातील फाटके कपडे, कुत्र्याने भाकरी पळवल्या म्हणून आईने केलेली मारहाण, नोकरी करताना गैरसमजातून शवागारात प्रेतासोबत घेतलेली झोप असे अनेक वास्तवदर्शी प्रसंग या आत्मचरित्रात आले आहेत. गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली होती. प्राचार्यांना भेटून परिस्थिती कथन करावी, त्यांच्याकडे काही काम मागावं या हेतूने लेखकाने प्राचार्यांची भेट घेतली. परंतु आपल्याच पदाच्या कोषात वावरणाऱ्या प्राचार्यांनी लेखकाची दखल घेतली नाही. हा प्रसंग कवितके यांच्या मनपटलावरून कधीही पुसला गेला नाही. पुढे आयुष्य स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी प्राचार्यांच्या नावे एक पत्र लिहिलं. एका वृत्तपत्रात ते प्रसिद्धही झालं.
आयुष्याशी लढा देण्याचा निकराचा प्रयत्न करूनही गरिबीमुळे, पैशाअभावी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं ही त्यांची खंत आहे. चष्म्याच्या दुकानात कामाला लागल्यानंतर 240 रुपयांचा पहिला पगार हाती पडला. पण याच पैशाअभावी माझं शिक्षण अर्धवट राहिलं या उद्विग्न भावनेतून त्यांनी पगाराच्या सगळ्या नोटा फाडून टाकण्याचा प्रसंग वाचकांचं काळीज उसवून टाकतो.
या आत्मकथनात कुठेही प्रासादिक, कल्पनारम्य, अलंकृत भाषा आढळत नाही. परंतु ती या आत्मकथनाची उणीव मानता येणार नाही. साधीसोपी भाषा, प्रसंगांचं हळुवार शब्दांकन, हलकीफुलकी कथनशैली या बाबी या आत्मकथनाची बलस्थाने आहेत. एका प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत यशस्वी आयुष्याला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे आत्मकथन म्हणून आयुष्य उसवतानाकडे बघताना मनावर संमिश्र भावनांचे तरंग उमटतात.
प्रकाशक : समीक्षा पब्लिकेशन
पृष्ठे : 200, मूल्य : 250 रुपये