पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा आज (रविवार) होणार आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी झाली आहे. या परीक्षांसाठी 80 केंद्रांवर एकूण 11 हजार 355 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
यापूर्वी 20 तारखेला ही परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा आज रविवार (दि.31) रोजी होणार असून 49 केंद्रांवर पाचवीचे 7 हजार 94 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. तर, 31 केंद्रांवर आठवीचे 4 हजार 261 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या नियोजनसाठी 80 केंद्र संचालकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. 550 पर्यवेक्षक, 150 शिपाई त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 8 फिरते तपासणी पथक असणार आहे.
सकाळी 11 ते दुपारी 12:30 या वेळेत प्रथम भाषा व गणित यांची प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जाणार आहे. तर, दुपारी 1:30 ते 3 या वेळेत तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी ही परीक्षा होईल. एकूण 150 गुणाची प्रश्नपत्रिका असेल. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. आठवीच्या प्रश्नपत्रिकेत 15 प्रश्नांना दोन पर्याय निवडायचे आहेत.