– विजय शेंडगे
विश्वास वसेकर हे साहित्यक्षेत्रातलं दमदार नाव. चाळीसपेक्षा अधिक साहित्यकृतींचा प्रपंच वसेकरांच्या नावावर आहे. एवढ्या प्रचंड साधनेनंतर लेखकाकडून येणारी साहित्यकृती अत्यंत आश्वासक, लालित्यपूर्ण असेलच असं नाही.
कारण अभिव्यक्तीच्या विहिरीतून एवढा उपसा गेल्यानंतर, साहित्यकृतीत गढूळपणा येण्याची शक्यता असतेच. परंतु “अनवट’ हा वसेकरांचा कवितासंग्रह शक्यतेला अपवाद आहे. स्त्री वयाच्या कोणत्याही वळणावर तिची प्रेमकहाणी कोणालाही सांगण्याचं धाडस करत नाही.
परंतु पुरुष मात्र त्याची प्रेमकहाणी मोठ्या अभिमानाने सांगतो. “अनवट’मधली विश्वास वसेकरांची कविता म्हणजे कवीच्या वयाच्या पन्नाशीनंतरच्या असफल प्रेमाची फलश्रुती आहे आणि ती त्यांनी अत्यंत काव्यमय पद्धतीने सांगितली आहे.
हिर-रांझा, लैला मजनू, रोमिओ-ज्युलिएट या सगळ्या असफल प्रेमाच्या कहाण्या. सफल प्रेमाच्या कहाण्यापेक्षा असफल प्रेमाच्या कहाण्या अधिक लोकप्रिय होतात. कारण असफल प्रेम नेहमीच काळीज पिळवटून टाकतं. “अनवट’मधील कविताही अशा असफल प्रेमाच्या, मंथनातून, प्रेमातील ताटातुटीच्या आक्रोशातून, प्रेम की समाज या अंतर्बाह्य संघर्षातून आलेली आहे.
त्यामुळे ही कवितादेखील चिरंतन होईल, असा विश्वास वाटतो. कोणताही शहाणासुरता माणूस प्रेम की समाज अशी निवड करण्याची वेळ येते तेव्हा समाजाची निवड करतो. कारण समाज हा त्याच्या जगण्याचा परिघ असतो. “मितवा’ या कवितेत कवी म्हणतो-
काय करू मी? फाडू पुस्तक?
माझं तर आज गाढवही गेलं, ब्रह्मचर्यही.
यातून प्रौढ वयातील प्रेम म्हणजे गाढवपणाच असतो. असंच कवीला सुचवायचं असावं.
“वाढदिवस’ ही कविताही अशीच अंगावर रोमांच उभी करते. कवी म्हणतो-
मीच मद्याच्या ताब्यात गेलोय
तेही तुझा स्पर्श न झालेल्या
प्रेम ही नशा आहे. प्रेम ही धुंदी आहे. अनेकांच्या प्रेमाच्या स्पर्शाची ओढ असते. परंतु या कवितेतील नायक मात्र स्पर्शाच्या आधीही प्रेमातील नशेची धुंदी अनुभवतो. त्यामुळेच या ओळी प्रेमातील सात्विकता अधिक ठळक करतात.
डॉ. किशोर सानप, डॉ. पंडितराव पवार, डॉ. भगवान कवठेकर यांची प्रस्तावना. राम शेवाळकर, डॉ. किसन पाटील, डॉ. विजय राजाध्यक्ष, पुरुषोत्तम पाटील, लक्ष्मीनारायण बोलली अशा अनेकांची कौतुकाची थाप या काव्यसंग्रहाला वजन प्राप्त करून देते.
प्रेमकविता हा काव्यप्रकार फार गढूळ झाला आहे. त्यामुळेच अलीकडे कोणताही कवी प्रेमकविता लिहायला धजावत नाही. स्त्री मुक्तीच्या, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या, जातीयवादावर प्रहार करणाऱ्या सामाजिक आशय मांडणाऱ्या कविता लिहिल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही, अशीच प्रत्येकाची धारणा झाली आहे. अशा वेळी “अनवट’मधून आलेली प्रेमकविता, प्रेमकवितेचा गढूळ झालेला प्रवाह निर्मळ करेल असा विश्वास वाटतो.