नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राने दिल्लीला दररोज 1,300 दशलक्ष गॅलन (एमजीडी) पाणी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली आहे. इतका पुरवठा केंद्र सरकारने केला तर आम्ही दिल्लीकरांना चोवीस तास पाणीपुरवठा सुनिश्चित करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केजरीवाल यांच्या हस्ते आज पटपरगंज गावात 11 दशलक्ष लिटर क्षमतेच्या भुमिगत जलसाठ्याचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, दिल्लीची लोकसंख्या सुमारे 80 लाख होती तेव्हा 800-850 दक्षलक्ष गॅलन पाणी मिळत होते. लोकसंख्या आता तिप्पट होऊन ती 2.5 कोटी झाली असली तरी अजूनही दिल्लीला केंद्राकडून तेवढेच पाणी मिळत आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे केंद्राने दिल्लीला 1300 दशलक्ष गॅलन पाणी पुरवावे आम्ही त्यानंतर दिल्लीला चोवीस तास पाणी मिळेल अशी व्यवस्था करू.
दिल्लीला शेजारील उत्तर प्रदेश आणि हरियाणामधून पाणी दिले जाऊ शकते, असे ते म्हणाले. यमुना, गंगा आणि शेजारील राज्यांच्या पाण्याव्यतिरिक्त, दिल्लीत स्थानिक स्त्रोतांद्वारे पाणी उपलब्धता वाढवण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या सात वर्षांत, जलशुद्धीकरण केंद्र, कूपनलिका आणि पावसाळी विहिरींच्या माध्यमातून दिल्लीतील पाण्याची उपलब्धता 861 दशलक्ष गॅलन वरून 990 दशलक्ष गॅलन इतकी झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिल्ली सरकारने गेल्या सात वर्षांत बारा जलाशय आणि तीन ट्रीटमेंट प्लांट बांधले,आहेत असे ते म्हणाले.