दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये खेळला जाईल. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी मजबूत असल्याने सामन्यात बरोबरीची लढत पाहायला मिळेल.
भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला होता. यामध्ये भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला ९ विकेट्सवर केवळ १०७ धावाच करता आल्या होत्या. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा संघ अवघ्या ९९ धावांत गारद झाला होता. मात्र इंग्लंडचा उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाला ९६ धावांवरच रोखले आणि सामन्यात ३ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील आजचा हा अंतिम सामना बरोबरीचा असणार आहे.
भारताला ‘ड’ गटात दक्षिण आफ्रिका, यूएई आणि स्कॉटलंडसह ठेवण्यात आले होते. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. यानंतर यूएईचा भारताने १२२ धावांनी तर स्कॉटलंडचा ८३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
त्यानंतर सुपर-सिक्सच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने सात गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे भारताला स्पर्धेतील पहिला पराभव मिळाला होता. यानंतर, सुपर सिक्सच्याच दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेच्या संघाचा सात विकेट राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला.