महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीस
सांडपाणी प्रक्रियेबाबत कृती आराखडा सादर करण्याची सूचना
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत सोडणे तातडीने थांबवावे तसेच सांडपाणी प्रक्रियेबाबत कृती आराखडा सादर करावा, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिका आयुक्तांना दिले आहेत. एवढेच नव्हे तर महापालिकेचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश सक्षम प्राधिकरणास का देण्यात येऊ नये, असा इशाराही दिला आहे.
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. डिसेंबर महिन्यात थेरगाव केजूदेवी बंधारा येथे मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिक राहुल सरोदे यांनी केल्यावर एमपीसीबी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ताथवडे स्मशानभूमीजवळील नदीपात्रात कासव मृतावस्थेत आढळले.
पवना नदीत चार ठिकाणांहून विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी मिसळत असल्याचे या पाहणी दरम्यान निदर्शनास आले होते. महापालिका सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करत नसल्याने नदीतील मासे मरण्याचे प्रकार वर्षातून दोनदा झाल्याचे निदर्शनास आले. रावेत मैलाशुद्धीकरण केंद्राची अवस्था बिकट आढळली. देखभाल दुरूस्तीचा अभाव जाणवला. प्रक्रिया केलेले सांडपाणी गढूळ, हिरवट रंगाचे आढळले. या सर्व तपशीलांचा, निरीक्षणांचा विचार करता एमपीसीबीने महापालिकेला पाणी (प्रतिबंध प्रदूषण नियंत्रण) कायदा 1974 नुसार, महापालिकेला नोटीस दिली आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकने नियमांचे उल्लंघन केले आहे. जलचर प्राण्यांची जीवितहानी पाहता पर्यावरणास हानी पोहचविली असल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावली आहे. वीज मंडळाला आदेश देऊन वीजपुरवठा तर पाटबंधारे विभागाला आदेश देऊन पाणीपुरठा खंडित करण्यास का बजावू नये?, महापालिकेच्या विरोधात कायदेशीर कारवाई का करू नये, अशी थेट विचारणा केली आहे. महापालिकेने विनाप्रक्रिया सांडपाणी पवना नदीत सोडणे तातडीने थांबवावे. नदी प्रदूषण रोखण्याबाबतचा कृती आराखडा तातडीने सादर करावा, असे आदेशही एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.
पालिकेची निव्वळ डोळेझाक – बाबर
पिंपरी – चिंचवड महापालिका पवना नदीतून दररोज 520 एमएलडी पाणी उचलते. तर, केवळ 312 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करते. 47 एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नद्यांचे मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण झाले आहे. जलपर्णी वाढली आहे. जलसृष्टीला मोठा धोका निर्माण झाला आहे. याला महापालिकेचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. वारंवार याकडे लक्ष वेधूनही महापालिका प्रशासन ठोस उपाययोजना राबविण्याऐवजी डोळेझाक करत असल्याचा आरोप माजी खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.