वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील वरोडीखुर्द, वरोडीबुदुक व वरोडी डायमुख, या तीन गावांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे, उन्हाचा तडाखा वाढल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाणी, स्वयंपाकघरात लागणारे पाणी, कपडे धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील वरोडीखुर्द १३५०, वरोडी बुदुक १४०० आणि वरोडी डायमुख १२५० या गावांची सुमारे ४ हजार लोकसंख्या आहे. पूर्वी तीनही गावांना पाणीपुरवठा योजना झाल्या असून वरोडी गावाच्या खाली दोन किलोमीटरवर मुळवा येथे विहिरी काढून केल्या होत्या.
या शिवाय वेरुळी येथे डोंगरात खडकात टाक्या बांधून उताराने पाणी आणले होते. उन्हाळ्यात झऱ्याचे पाणी कमी पडते व या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. मार्च,एप्रिल व मे महिन्यात पाणी कमी पडते. यामुळे मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरू झाली असून दोन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. तोही पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांची विशेषता महिलांची पाण्यासाठी दिवसभर वणवण सुरू आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने जलजीवन मिशनअंर्तगत वरोडीखुर्द,वरोडीबु व वरोडी डायमुख या तीन गावांना सुमारे ५ कोटी ५० लाख रु नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून धावडी गावाजवळ विहिरी काढण्यात आली आहे. विहिरीचे बांधकाम झालेले आहे. या विहिरीवरून पाणी उचलून वरोडी डायमुख येथे टाकी बांधून तीनही गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या टाकीचे काम झालेले आहे. मात्र, मुख्य पाईप लाईन व गावातील वितरण व्यवस्थेचे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. काम पूर्ण झाल्यावर ही योजना सुरू होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले.
दरम्यान तीनही गावांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यामुळे मागील १५ दिवसांनी दोन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले आहेत. मात्र, अद्याप टँकर सुरू झालेला नाही. त्यामुळे महिलांना दिवसभर पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकावे लागत आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र झाल्याने भोर पंचायत समितीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. दोनच दिवसात पंचायत समितीमार्फत टॅंकर सुरू होवून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. -शीतल संदीप भिलारे, सरपंच, वरोडी खुर्द (ता.भोर)