नगर – शहराचा स्वच्छता सर्वेक्षणात घसरलेल्या टक्का सुधारण्यासाठी व शहर कचराकुंड्या मुक्त करण्याचा मानस महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आज शहरातील तब्बल 106 कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. मात्र, या कचराकुंड्या हटविल्यामुळे नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा टाकन्याचे काम सुरु केले असून या नागरिकांना शिस्त कोण लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील सुका व ओला कचरा असे वर्गीकरण करून कचरा संकलित करण्यात येत आहे. त्यासाठी 65 पैकी 50 स्वच्छता घंटा गाड्यांना जीपीएस ऍप बसविण्यात आले आहेत. स्वच्छता ऍपचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही स्वयंसेवी संस्था, शाळा, बचतगट आदींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
शहरात घर ते घर कचरा संकलन व वाहतुकीसाठी खासगीकरणातून काम सुरू करण्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील कचरा उचलण्यासाठी कायम कचरा टाकल्या जाणाऱ्या जागांवर स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. पूर्ण क्षमतेने कचरा संकलन व्हावे, यासाठी नवीन वाहनांची खरेदी होत आहे. प्लास्टिक मुक्त शहरासाठी शासनाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मात्र, शहरात ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. त्यामुळे शहर कचराकुंडी मुक्त करण्याच्या योजनेचा फज्जाच उडाला असून त्याला नगरकरांचे ही सहकार्य लाभेना. त्यासाठी महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी 16 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. शहरातील कचरा संकलनाचा ठेका पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट दिला आहे. मात्र, कचरा संकलन करणारे वाहने थांबत नसल्याने शहरातील नागरिक इतरत्र कचरा टाकत आहे. त्यामुळे हा कचरा तसाच पडून राहत आहे.
तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या, महामार्गाच्या आणि मुख्य चौकांच्या दोन्ही बाजूचे तसेच रस्ता दुभाजक मध्ये वाढलेले गवत, काटेरी झाडे झुडपे काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र काही नागरिकांकडून रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यात पालिकेने कचराकुंड्या हटविल्याने नागरिक त्याठिकाणीच कचरा टाकत आहेत. त्यांना शिस्त कोण लावणार हा मुख्य प्रश्न आहे.