जयपूर – कॉंग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मला सांगितले आहे की, त्यांना (गेहलोत) माफ करा, विसरा आणि पुढे जा असे सांगितले आहे. म्हणून मी भविष्याचा विचार करत आहे. मी राजस्थानसाठी पाच वर्षांचा रोडमॅप पाहत आहे. आम्ही मिळून कॉंग्रेसला विजयी करू. यानंतर कोण काय करायचे हे आमदार आणि नेतृत्व ठरवतील, असे प्रतिपादन सचिन पायलट यांनी केले आहे.
2018 च्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक कशी वेगळी आहे, असे विचारले असता पायलट म्हणाले की, त्यावेळी कॉंग्रेस विरोधी पक्षात होती. यावेळी लोकांनी आमचे पाच वर्षांचे काम पाहिले आहे, आम्ही गावागावात केलेला विकास पाहिला आहे. ही निवडणूक ऐतिहासिक असेल, परंपरा बदलेल आणि कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येईल.
राजस्थान निवडणुकीची तारीख अगदी जवळ आली आहे. अशा स्थितीत कॉंग्रेसनेही आपला निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. मात्र दरम्यान, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये पक्षाच्या सरकारचे नेतृत्व कोण करणार हे निवडून आलेले आमदार आणि कॉंग्रेस हायकमांड ठरवतील, असे कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटले असून, ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची अटकळ जोर धरू लागली आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे प्रतिस्पर्धी गेहलोतही मागे नाहीत, ज्यांच्याकडून त्यांना कडवी स्पर्धा आहे. गेहलोत आणि पायलट यांच्यामधील शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर, 2020 मध्ये कॉंग्रेस सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे यावेळेस पक्षाने निवडणुकीसाठी एकजूट करण्याचा प्रयत्न केला आहे.