नवी दिल्ली – गेल्या २५ वर्षांपासून आमच्या कुटुंबाच्या विरोधात सर्व प्रकारच्या चौकशा आणि तपास सुरू आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांना आम्ही बोलावलेही नव्हते आणि जाण्यासही सांगितले नाही अशी प्रतिक्रिया बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या राबडी देवी यांनी व्यक्त केली आहे.
राबडी म्हणाल्या की नितीश आज जे काही करत आहेत त्याला ते स्वत: जबाबदार आहेत. मागच्या वेळीही ते स्वत: आले होते व स्वत: परत गेले. गेल्या २५ वर्षांपासून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्था आमच्या विरोधात तपास करत आहेत. त्यातून नवे काहीच निष्पन्न झालेले नाही. बिहारची जनता आमच्यासोबत आहे.
दरम्यान, आजपासून सुरू करण्यात आलेल्या आपल्या जनविश्वास यात्रेबाबत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले १७ महिने सरकारमध्ये असताना आम्ही जी कामे केली ती जनतेसमोर ठेवणार आहोत. मुख्यमंत्री नितीश कुमार जनतेच्या निर्णयाला कोणते महत्व देत नाही. आता जनताच त्याचे उत्तर देईल.
दरम्यान, विधानसभा विसर्जित करण्याची नितीश कुमार यांची इच्छा असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्या अनुशंगाने बोलताना तेजस्वी म्हणाले की नितीश यांना लोकसभा निवडणुकीसोबतच बिहार विधानसभेचीही निवडणूक व्हावी असे वाटते आहे. त्यातून आपल्या पक्षाचा विस्तार करण्यास मदत होईल असे त्यांना वाटते आहे.