मुंबई – करोनाचं संकट गहिरं होत असताना, इकडे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीची नियमित आढावा बैठक होत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. करोना लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत. राज्यात करोना कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करू, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या या संवादामुळे महाविकास आघाडीत काहीसं तणावाचं बनलेलं वातावरण निवळण्याची चिन्हं आहेत.
राहुल गांधी म्हणाले, शिवसेना आणि कॉंग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात कॉंग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी ठाकरे यांना दिली. तर सरकारमध्ये कॉंग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत कॉंग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची क्लिप व्हारयल झाली होती. यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेत आहे. मात्र, आम्हाला मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्यामुळे कॉंग्रेस नाराज असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.