सातारा – सातारा शहरानजिक असलेल्या आवाडवाडी (आंबेदरे) ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. टॅंकरचा प्रस्ताव व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पत्र देवूनही महिना उलटला तरी पाण्याचा टॅंकर सुरु झाला नव्हता. याबाबत दैनिक प्रभातने वस्तुस्थिती मांडून तात्काळ टॅंकर सुरु होण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आवाडवाडीला पाण्याचा टॅंकर मंजूर झाला आहे. “प्रभात’ने याबाबत आवाज उठवून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्याबद्दल ग्रामस्थांनी दै. प्रभातला धन्यवाद दिले आहेत.
आवाडवाडी (आंबेदरे) पाणीपुरवठा विहिरीतील पाणी पातळीने तळ गाठला असून पाचपैकी तीन हातपंपांची पाणी पातळी खालावली आहे. परिणामी येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठवूनही अद्याप टॅंकर सुरु झालेला नाही. याबाबत ग्रामस्थांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची समक्ष भेटून व्यथा मांडली आहे. त्यानंतर तहसील कार्यालयाशी दि. 4 एप्रिल रोजी पत्रव्यवहार करुन तात्काळ टॅंकर सुरु करण्याच्या सुचना आमदार भोसले यांनी केल्या होत्या.
मात्र, पत्र देऊन महिना झाला तरी अद्याप टॅंकर सुरु झाला नसल्याबाबत दै. प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले होते. दै. प्रभातने याबाबत आवाज उठवल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही तात्काळ टॅंकर सुरु करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार आवाडवाडीस पाण्याचा टॅंकर मंजूर करण्यात आला आहे.