कराड – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णपणे लागू करण्याचा निर्धार केला असून हे शैक्षणिक धोरण नवनिर्मितीला चालना देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. तसेच कुलपतींचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, डॉ. अतुल भोसले, डॉ. ए. एम. देशमुख, डॉ. गिरीश पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या दोन दिवसीय परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केलेले संशोधन प्रकल्प थक्क करणारे आहेत, असे गौरवोद्गार काढून कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी भारतीय कृषी उद्योगाच्या विकासासाठी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन संशोधन होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेसच्या माध्यमातून जैवअर्थशास्त्र शाखा सुरू करुन, येत्या काळात या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद घ्यावी, असे आवाहन डॉ. अतुल भोसले यांनी केले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, जैवतंत्रज्ञान हे भारताचे भविष्य आहे. बायोमेक इंडियाची पायाभरणी सुरू झालेली आहे. येत्या काळात अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे मोठे योगदान राहील, याची मला खात्री आहे.
राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्कारांचे वितरण
या परिषदेत अखिलेशकुमार (बिहार), नंदकुमार कदम (शिराळा), धैर्यशील यादव (शिराळा), डॉ. आशिष पोलकडे (पुणे), डॉ. प्रशांत ठाकरे (अमरावती), डॉ. महेश चवदार (सांगली), डॉ. नीरज घनवटे (अमरावती) यांना राष्ट्रीय बायोटेक पुरस्कार, तर डॉ. शर्वरी रोकडे (कोल्हापूर) हिला राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच प्रीतिमान कौर (पंजाब), कु. कुसूम (हिमाचल प्रदेश), उद्दिप्ता गुहा (मेघालय), कार्तिक चौहान (गुजरात), यशवंत पाटील (शिराळा), ऋषिकेश शिंदे (सातारा), डॉ. रविराज शिंदे (मुंबई), अमेय रांजेकर (पुणे), जय भट्ट (गुजरात), राहुल शेळके (बार्शी), निकुंज परमार (गुजरात) यांना राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.