खटाव, (प्रतिनिधी) – दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या खटावमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचातीतर्फे बुधवारी (दि. 13) तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
या प्रस्तावात म्हटले आहे की, खटाव येथे तीव्र पाणीटंचाई आहे. गावाची आणि वाड्यावस्त्यांची लोकसंख्या नऊ हजार 827 आहे. गावातील हातपंप, विद्युतपंप, नळपाणी पुरवठा योजना, खाजगी बोअरवेल, विहिरी या स्रोतांपासून मिळणारे पाणी अपुरे असून.
शासन नियमानुसार माणशी 20 लिटर पाणी आवश्यक आहे. गावाच्या दीड किलोमीटर परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. इतर उपाययोजना करूनही पाणी उपलब्ध होत नसल्याची खात्री केली आहे. या बाबींचा विचार करता गाव आणि वाडीवस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा. या प्रस्तावावर तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षर्या आहेत.