पुणे : म्हाळूंगे गावाचा महापालिकेत समावेश झाला असला तरी, अद्यापही गावाला महापालिका 20 दिवसातून एकदा पाणी देते. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्याच्या तीव्र समस्येचा सामना करावा लागत असून महापालिकेने तातडीनं म्हाळूंगेचा पाणीप्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी गावातील महिलांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. शिवसेनेचे युवासेना जिल्हा समन्वंयक मयुर भांडे यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे आपली व्यथा मांडली.
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये हे गाव असून गावची लोकसंख्या 40 हजारांच्या आसपास आहे. या गावास महापालिका 15 ते 20 दिवसातून एकदा पाणी देते.
त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. याचा आक्रोश यावेळी या महिलांनी मांडला. तसेच याबाबत तातडीनं उपाय योजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, पुढील 4 दिवसात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह म्हाळूंगे गावची पाहणी करणार असून गावातील नागरिकांना जास्तीत जास्त पाणी देण्यासाठी तातडीच्या उपाय योजना करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुमार यांनी दिले असल्याचे भांडे म्हणाले.