मोरगाव – मोरगाव प्रादेशिक नळ योजनेची बारामती तालुक्यातील 13 गावांची गतवर्षीची थकबाकी 4 कोटी पन्नास लाख रुपये आहे. गत महिन्यातील साडेबारा लाख रुपये असल्याने मोरगावसह बारा गावांचा पिण्याच्या पाण्याचा नळ पाणी पुरवठा तोडला असल्याने या गावातील ग्रामस्थाना ऐन उन्हाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील नाझरे जलाशयावर मोरगाव प्रादेशिक ही पिण्याच्या पाण्याची नळपाणी योजना सुरु आहे. या योजनेमुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावातील महिलांच्या डोईवरचा हंडा उतरला आहे. योजनेवर मोरगाव, भोंडवेवाडी, तरडोलीनजीक पवारवाडी पाटी, लोणी भापकर वाड्यावस्त्या, बाबुर्डी, काऱ्हाटी, माळवाडी, जळगाव कप, जळगाव सुपे, कऱ्हावागज, अंजनगाव ही गावे अवलंबून आहेत.
प्रत्यक्ष पाणी वापर व वसुल पाणीपट्टी यांचे ग्रामपंचायतीना न जुळणारे सुत्रामुळे पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने गेल्या महिन्यापासून या योजनेचे खासगीकरण करुन वीजबिल, नाझरे पाणी पट्टी, दुरुस्ती व देखभाल खासगी संस्थेकडे देण्यात आले आहे. गतवर्षाची वरील गावांची पाणीपट्टी सुमारे साडेचार कोटींपेक्षा अधिक आहे. तर खासगीकरण केल्यानंतर गेल्या महिन्यातील साडेबारा लाख रुपये थकितपट्टी आहे.
केवळ चालु बाकी भरण्यासही वरील गावांनी असमर्थता दाखविल्याने पाणीपुरवठा बंद केला असल्याची माहिती बापू रासकर यांनी दिली. वरील गावांपैकी केवळ आंबी बुद्रुक ग्रामपंचायतीने पूर्ण पाणीपट्टी भरली आहे. मोरगाव, जळगाव व आंबी खुर्द यांनी एकूण बाकीच्या अर्धी रक्कम भरली आहे.
मात्र, थकबाकी पूर्ण भरल्याशिवाय पाणी सोडले जाणार नसल्याचे योजनेच्या ठेकेदारांनी यावेळी सांगितले. सरपंच निलेश केदारी म्हणाले की, मोरगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी तात्काळ पाणी पट्टी भरावी व
सहकार्य करावे.
मोरगाव प्रादेशिक नळ योजनेचे खासगीकरण झाले आहे. आम्हाला वीजबील, पाणीपट्टी, कामगार पगार, दुरुस्तीसाठी आदी खर्च करावा लागत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने थकीत पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे.
बापू रासकर, ठेकेदार