पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मागील तीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील श्रीमंत महापालिकेत पिंपरी चिंचवड महापालिकेची गणना होते. परंतु चिखलीत आज पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मागील काही महिन्यांपासून सातत्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. हातातील सर्व कामधंदे सोडून पाण्याची वाट बघण्याची वेळ नागरिकांवर सातत्याने येत आहे. महापालिकेकडून पुरेशा दाबाने आणि वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांत नाराजी आहे.
चिखली परिसरात बुधवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान होणारा पाणीपुरवठा सकाळी साडेअकरानंतर काही प्रमाणात सुरू झाला. त्यात देखील बहुतांश सोसायट्यांमध्ये पाणी येत नव्हते. तर काही सोसायट्यांमध्ये पाण्याची धार खूप कमी आणि खंडित पद्धतीने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, साने चौक परिसरातील नागरिक पाण्यासाठी हैराण झाले होते. मागील काही दिवसांपासून मुळात महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा कमी आणि पुरेशा दाबाने करण्यात येत नाही. त्यात दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे बैठ्या घरांमध्ये आणि तीन चार मजली घरे असणाऱ्यांकडे पाणी साठवून ठेवण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने नागरिकांना खासगी टॅंकर अथवा महापालिकेकडून टॅंकर मागवून तहान भागविण्याची वेळ आली आहे. महापालिकेला पाण्याचे योग्य नियोजन करता न आल्याने कर, पाणीपट्टी देऊनही नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.
व्हॉल्व दुरुस्तीमुळे अडथळा
साने चौकाजवळ चिखली परिसरातील मोरेवस्ती, साने चौक, म्हेत्रेवस्ती, चिंचचेमळा, अष्टविनायक चौक आदी परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेला व्हॉल्व ना दुरुस्त झाल्याने बुधवारी सकाळी पाणीपुरवठा करण्यास अडथळा आला. परंतु व्हॉल्व एका दिवसात खराब होत नाही. काल पाणीपुरवठा होणार नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कालच याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतु तहान लागल्यानंतर विहीर खोदायची या म्हणीप्रमाणे नियोजनशून्य कारभार महापालिका करत असल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
आठ दिवसांपूर्वी केलेला रस्ता खोदला
भाजी मार्केट शेजारील रस्ता महापालिकेच्या वतीने मागील आठ दिवसांपूर्वी डांबरीकरण केले आहे. परंतु महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या व्हॉल्व दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने आठ दिवसांत पुन्हा पाणीपुरवठा विभागाने येथील रस्ता खोदाई करून दुरुस्ती केली. महापालिकेच्या विविध विभागांत समन्वय नसल्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याला पुन्हा खड्डे पडून नागरिकांना त्रास होणार आहे.
सध्या मुलांच्या सकाळच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच घरातील माणसांना कामावर, नोकरीला तसेच कामधंद्यासाठी सकाळी लवकर बाहेर पडायचे असते. परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आम्हाला सातत्याने पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.
– अश्विनी जमदाडे, गृहिणी.
गृहिणी, नोकरदार यांचे नियोजन कोलमडले
चिखली परिसरात बहुतांश कामगार वर्ग, नोकदार, व्यावसायिक वास्तव्यास आहेत. सकाळी नियोजित वेळेत पाणी न आल्याने आल्याने सर्वांचे नियोजन कोलमडले. आज पाणी भरले नाही तर पुन्हा दोन दिवस पाण्याविना राहवे लागणार असल्याने बहुतांश घरातील गृहिणी आणि कामगार, नोकदार यांच्या दैनंदिन नियोजनात बिघाड झाला. काही कामगारांना पाण्यासाठी घरी राहवे लागले. काही महिलांचे व्यवसाय आहेत. त्यांना व्यवसाय बंद ठेवून पाण्याची प्रतीक्षा करावी लागली. या सर्वांच्या आर्थिक नुकसानीस महापालिका जबाबदार आहे. त्यामुळे महापालिकेने अपत्तीपूर्व नियोजन करणे गरजेचे आहे.