बिदाल – सातारा जिल्ह्यासह सर्वत्र गेले दोन दिवस झालेल्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. माण तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातही चांगला पाऊस झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तसेच पिकांमध्ये पाणी असल्याचे पहावयास मिळाले. अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार पडलेल्या पावसाच्या पाण्यावर मागील आठवड्यात ज्वारी, कांदा, भाजीपाला व चारा पिके केली होती ती अनेक ठिकाणी पावसामुळे पाण्याखाली गेलेली दिसत आहेत.
माण तालुक्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. माण तालुक्यात सोमवारी आणि मंगळवारी वादळी वाऱ्यांसह पावसाने अक्षरश झोडपून काढले. त्यामुळे तलाव, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑक्टोबर हीट वाढल्याने वातावरणात सकाळपासून उकाड्यात वाढ होत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाल्याने काही भागांत हवामान ढगाळ होते. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आंधळी, बिदाल, बिजवडी, वावरहिरे, दहिवडी, गोंदवले, परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.
चांगला बाजारभाव असल्याने शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी टोमॅटो, वांगी आदी तरकारी पिकांची लागवड केली आहे. या पावसाने कांद्याची रोपे जाग्यावर सडून गेली आहेत. टोमॅटो वांगीच्या फुलांची मोठ्या गळती झाली आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. सततच्या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. पावसामुळे लागवड सऱ्यांमध्ये पाणी साठले आहे. परिसरातील बाजरी पीक जवळपास सर्व शेतकऱ्यांची मळणी व काढणी झाल्यामुळे बाजरी हाताशी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, काही शेतकऱ्यांना झालेल्या पावसाने शेतातील बाजरी पीक सोडून द्यावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.