सर्वच पिके पाण्याखाली, ताली फुटल्या, अनेक रस्ते बंद
वाघापूर – पुरंदर तालुका दुष्काळी म्हणून गणला जात असतानाच यावर्षी वरूणराजाची मोठी कृपा तालुक्यावर झाली आहे. गेल्या महिन्यांत कऱ्हा नदीला पूर आल्यानंतर काठावरील गावांची दैना उडाली होती, त्यातून सवरासावर सुरू असतानाच पावसाने पुन्हा हाहाकार माजवला असून कऱ्हा नदीचे पाणी वाढले आहे.
पुरंदर तालुक्यात सर्वत्र गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने जागोजागी तळी साचल्याचे दृश्य आहे. कऱ्हेला पाणी वाढल्याने काठावरील गावांना पुन्हा एकदा सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी ओढ्या-नाल्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने मुख्य, तसेच अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत. शेतातच तळी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पाण्याच्या जोराने शेताच्या ताली तुटल्या आहेत. काही ठिकाणी बांधही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील धरणांतूनही विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या काठ सोडण्याच्या बेतात असल्याने काही गावांत स्थलांतराची तयारी करण्यात आली आहे. नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुराचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील चांबळी, गराडे, कोडीत, हिवरे, नारायणपूर, भिवडी आणि किल्ले पुरंदरच्या पट्ट्यात पावसाचे प्रमाण मोठे आहे. धरणांतून विसर्ग सोडण्यात येत असल्याने कऱ्हेचे पाणीही वाढत आहे. यामुळे तहसील कार्यालयाजवळील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे सासवड-नारायणपूर रस्त्यावरील वाहतूक दुपार पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या पुलाचे नुकसान झाले असून तात्पुरत्या स्वरूपात पोलीस बंदोबस्तात वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. सासवड-वनपुरी रस्त्यावरील आंबोडी गावाच्या धरणावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून हा रस्ता संपूर्ण दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
फळबागांचे मोठे नुकसान…
पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातही पावसाचे मोठे प्रमाण असून शेतकऱ्यांची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. भुईमूग, बाजरी, ज्वारी, हरभरा, कांदा, कोथंबीर, गाजर ही पिके पाण्याखाली गेली आहेत. फुल पिकांमध्ये आणि डाळिंब, सीताफळ, पेरू या फळ पिकांच्या बागेत पाण्यामुळे अक्षरशः तळे साचले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.