पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस महापालिकेकडून आता सवलतीच्या दरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेकडून बाजार समितीला व्यावसायिकदराने पाणीपट्टी आकारली जात होती. मात्र, याचे दर जास्त असल्याने ते कमी करण्याची मागणी बाजार समितीने शासनाकडे केली होती
त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हे दर कमी करण्याच्या सूचना महापालिकेस केल्या, त्यानंतर पालिकेने ६० टक्के दर कमी केले. याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समिती बैठकीतही मान्यता देण्यात आली. मात्र, हे दर कमी करतानाच बाजार समितीकडे असलेली १२ कोटी ३९ लाख २४ हजार ६६९ कोटी रूपयांची थकबाकी भरल्यानंतरच सवलत दराची अंमलबजावणी होणार आहे.
६० टक्के सवलत…
महापालिकेकडून बाजार समितीला मीटरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. प्रती १ हजार लिटर ६७ रूपये दर आकारला जात होता. त्यापुढील पाण्यासाठीही वाढीव दर होता. मात्र, हा दर जास्त असल्याचे सांगत पाण्याचे दर कमी करावेत, अशी मागणी बाजार समितीने केली होती.
अखेर पालिकेने हे दर कमी करण्याचा निर्णय घेत प्रती हजार लीटर पाण्यासाठी ३० रूपये (५० हजार लीटर पर्यंत) तर त्या पुढील पाण्यासाठी प्रती हजार लिटर २० रूपये दर आकारला जाणार आहे. त्यामुळे बाजारसमितीला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.