नवी दिल्ली :- भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचे भवितव्य उज्वल आहे मात्र, त्याने स्विंगवर लक्ष देण्याबरोबरच आपल्या गोलंदाजीचा वेगही वाढवला पाहीजे, असे मत पाकिस्तानचा महान डावखुरा वेगवान गोलंदाज व माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे.
अर्शदीपने जास्तीत जास्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले पाहिजे. मी त्याची गोलंदाजी अनेकदा पाहिली आहे. त्याच्याकडे स्विंग आहे पण त्याला वेग वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची गरज आहे. तो तरुण आहे आणि त्याची गोलंदाजी मला आवडते.
अर्शदीप हा केवळ धावा रोखणारा नव्हे तर सातत्याने बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याचे भविष्य नक्कीच चांगले आहे. त्यामुळे तो जितका जास्त खेळेल तितका वेग तो निर्माण करू शकेल.
झहीर खानच्या निवृत्तीनंतर भारताला एका अव्वल डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची गरज होती. भारतीय संघाने आतापर्यंत बरिंदर सरन, खलील अहमद तसेच चेतन साकारिया सारख्या खेळाडूंना संधी दिली मात्र, आता त्यांनी अर्शदीपवर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही अक्रम म्हणाला