मुंबई – राज्यासह देशभरात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर मराठवाड्यात हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात 1 आणि 2 जुलैला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईला दिलेल्या ऑरेंज ऍलर्टचा मुहूर्त चुकल्यानंतर रविवारी मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. उत्तर मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाचा वाढलेला जोर लक्षात घेतल्यानंतर प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई विभागासाठी सोमवारीसाठी ऑरेंज ऍलर्ट पुन्हा जारी केला.