पुणे – पंढरीची वारी आणि पर्यावरण याचे नाते अतूट आहे. त्यामुळे आता या पर्यावरण रक्षणासाठी वारकऱ्यांनी कंबर कसली आहे. पुण्यातील कत्तल होऊ घातलेली सहा हजार झाडे वाचवण्यासाठी वारकरी संस्था सरसावल्या आहेत.
“ग्रीन वारी’, “पर्यावरण वारी’ असे अनेक उपक्रम वारीमध्ये आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो, अनुभवतो आहोत. अनेक संस्थांचे प्रतिनिधी, लोक वारीच्या मार्गावर डोंगरदऱ्यात, शेताच्या कडेला, माळरानावर अनेक बीजगोळे टाकण्याचा उपक्रम करत आहेत. ही बीजे पावसाळ्यात रुजतात आणि त्याची वृक्षराजीत रुपांतर होते. पर्यावरणासाठी हा हातभार लावला जात आहे. पण आता या वृक्षराजीचे जतनही केले पाहिजे, त्याविषयीच्या जागृतीच्या विषयात आता संस्थांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे या वृक्षसंपदेला वाचवण्यासाठी ते रस्त्यावर उतरणार आहेत.
पुण्याचा नदी पात्रातील सहा हजार झाडांच्या कत्तलीचा विषय सध्या प्रचंड तापला आहे, तो आणखी तापण्याची शक्यता आहे. अनेक सामाजिक संस्था “चिपको आंदोलन’ करणार आहेत. अशातच “अंघोळीची गोळी’ संस्थेचे माधव पाटील वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांना निवेदन देऊन तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे , वनचरे’ या विचारांवर कार्य करणाऱ्या वारकरी संप्रदायाची एकजूट करत आहेत.
हा विषय फक्त सहा हजार झाडांपुरता मर्यादित नाही. नदी पात्रात कॉंक्रीटीकरण केल्यास झाडांवर आणि नदीवर अवलंबून असलेली परिसंस्था धोक्यात येईल. एका झाडाभोवती किमान 50 जीव अवलंबून असतात. त्यामुळे सहा हजार झाडे तोडली तर किमान 30 हजार जीवांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
“पुणे महानगरपालिकेला एकही झाड तोडू देणार नाही. वेळ पडली तर सर्व वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असे आश्वासन शिवाजी महाराज मोरे यांनी दिले.
मुळा, मुठा नदीपात्रातील सहा हजार झाडांची कत्तल म्हणजेच “जालियनवाला बाग’ हत्याकांड आहे. हे थांबवण्यासाठी “चिपको’ आंदोलनात सहभागी होणारच आहे. परंतु वारकरी संप्रदायाची भक्तीसुद्धा सोबत यावी, यासाठी प्रयत्न करतोय.
– माधव पाटील, “अंघोळीची गोळी’ संस्था