म्हणे गुणवत्तावाढीसाठी करणार प्रयत्न; आयुक्तांसोबत बैठकीचा दिखावा
पिंपरी – नवीन शैक्षणिक समितीची स्थापना झाल्यानंतरही सुरुवातीचे अनेक दिवस विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करीत ठेकेदारांना पोसण्याचे उद्योग करणाऱ्या शिक्षण समितीच्या सदस्यांसह अध्यक्षांना तब्बल अडीच महिन्यानंतर जाग आली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले असताना आता गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्याचा साक्षात्कार शिक्षण समितीला झाला असून, हेच कारण पुढे करून नुकतीच शिक्षण समितीची आयुक्तांसोबत बैठक झाली. शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना आता नेमकी कोणत्या पद्धतीने गुणवत्ता वाढवणार? याबाबत वेगवेगळी चर्चा रंगली असून आयुक्तांसोबत झालेली बैठक नेमकी विद्यार्थ्यांच्या की स्वत:च्या भल्यासाठी घेण्यात आली याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर 2018 मध्ये पहिल्यांदा शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली. मागील वर्षी पहिल्यांदाच स्थापन झालेल्या शिक्षण समितीने अनेक धाडसी निर्णय घेतले व शाळांमध्ये नवनवे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची व शाळांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न झाले. या समितीने एक वर्ष काम केल्यानंतर अडीच महिन्यांपुर्वी जुनी समिती बरखास्त होऊन नविन शिक्षण समिती स्थापन झाली. या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मनीषा पवार यांची निवड झाली. मात्र, मनिषा पवार यांची निवड झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तर त्यांना कारभार समजून घेण्यात गेली. त्यानंतर त्यांनी समितीची पहिली बैठक घेतली मात्र या बैठकीत ठोस असे काहीच निर्णय घेतले नाहीत. नविन शिक्षण समितीची स्थापना झाल्यानंतर काही दिवसात शाळेच्या द्वितीय सत्राला प्रारंभ झाला होता. त्यामुळे, द्वितीय सत्राच्या सुरुवातीला ठोस निर्णय घेवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता असताना शिक्षण सभापती आणि शिक्षण समितीचे सदस्य मात्र शाळेंना भेटी देत फिरत राहिले.
या भेटीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे अभ्यासण्याची गरज असताना शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी केवळ नवनविन कामे काढून ठेकेदार कसे पोसले जातील यावरच भर दिला. शाळेच्या इमारतींची व फर्निचरची सद्यस्थिती जाणून घेवून “नवीन कामे’ कशी करता येईल याची पहाणी केली. त्यादृष्टीनेच त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून शाळेचा भौगोलीक अहवालही मागवून घेतला. त्यामुळे, सुरवातीच्या अडीच महिन्यांत कोणतेच ठोस निर्णय या समितीने घेतले नाहीत.
आता शाळेचे द्वितीय सत्र सुरु होवून महिनाभराहून अधिक काळ लोटला आहे. दहावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फेब्रुवारीत सुरू होत आहेत तर वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत. द्वितीय सत्र संपण्यास काही दिवसच शिल्लक असताना मंगळवारी (दि.31) शिक्षण समितीने आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. वर्ष संपण्याच्या शेवटी झालेला हा साक्षात्कार विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर एका ठेकेदाराला नविन काम देण्याच्या उद्देशानेच झाल्याचे समोर आले आहे. शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मुल्यमापन करण्यासाठी क्वालिटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आता काम करण्यात येणार असल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले.
82 लाखांच्या वह्यांची थेट खरेदी
द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांना वह्याची आवश्यक्ता असल्याचे सांगत शिक्षण समितीने विद्यार्थ्यांना 82 लाखांच्या वह्या पुरविण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ही खरेदी थेट पद्धतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांना वह्या पुरविण्यापेक्षा ठेकेदार पोसण्याबरोबरच या ठेकेदारीमागील कमिशनच अधिक महत्त्वाचे ठरल्याचे बोलले जात आहे. या वह्यांचा पुरवठा करण्यासाठी आणखी किमान महिनाभराचा कालावधी लोटणार आहे. वह्या हातात पडेपर्यंत विद्यार्थांचा बहुतांश अभ्यासक्रम पूर्णही झालेला असणार आहे. त्यामुळे, आता विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली वह्यांची खरेदी नेमकी कोणाच्या फायद्याची याबाबत वेगवेगळी चर्चा सध्या पालकांमध्ये सुरू आहे.