गरीब, गरजू व्यक्तींना फक्त 10 रुपयांत मिळणार जेवण
पुणे – गरीब व गरजू व्यक्तींना फक्त 10 रुपयांत “शिवभोजन’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरांत अशा दोन ठिकाणी “शिवभोजन’ सुरू होणार आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे 1 हजार 500 नागरिकांना जेवण अवघ्या 10 रुपयात मिळणार आहे. यासाठीची पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरू केली आहे. याविषयीचा आढावा मंत्रालयातील पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी नुकताच घेतला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्याच्या मुख्यालयी ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी शिवभोजनालय सुरू होणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत नागरिकांना जेवण उपलब्ध असणार आहे. यासाठी जागेचा शोध आणि कोणत्या संस्था या योजनेसाठी पुढे येऊ शकतात, याविषयीचा आढावा पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला. “शिव भोजनलाय’ सुरू करणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची आवश्यक तेवढी जागा असणे आवश्यक आहे. योजनेसाठी सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी एका सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड केली जाणार आहे. त्याचबरोबर या भोजनालयामध्ये एकाचवेळी किमान 25 लोक जेवण करण्यासाठी बसू शकतात, एवढी आसनव्यवस्था असणे आवश्यक आहे.
महापालिकास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती या योजनेसाठी भोजनालयाची निवड करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
…असे असणार थाळीत पदार्थ
या थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम एक वाटी वरण समाविष्ट करण्यात आले आहे.