ऑस्ट्रेलियातील घटनेवरून आपण शहाणपण शिकणार का?
पुणे – ऑस्ट्रेलियात जंगलातील आगीत होरपळून लाखो वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राज्यातही सुमारे 40 टक्के वनक्षेत्र हे अतितीव्र वणवाप्रवण या प्रकारात समाविष्ट आहे. त्यामुळेच वणव्याबाबत अधिक सावधता बाळगण्याची गरज पर्यावरण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने भारतीय वनांच्या सद्यस्थितीबाबत अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, महाराष्ट्रातील तब्बल 40 टक्के वनक्षेत्र हे अतिवणवा प्रवण वनक्षेत्र या प्रकारात समाविष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील वनक्षेत्राचा समावेश आहे.
अहवालानुसार राज्यात तब्ब्ल एक लाख 42 हजार 941.19 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे. यापैकी 40 टक्के वनक्षेत्र अतिवणवाप्रवण वनक्षेत्र आहेत. यामध्ये ठाणे, पुणे, रत्नागिरी, रायगड, अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमधील वनक्षेत्रांचा समावेश आहे. भारतीय वनसर्वेक्षण संस्थेतर्फे या वनक्षेत्रांचा सॅटेलाइटच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. तसेच या वनक्षेत्रातील वणव्यांबाबत “मोडीस’ आणि “एसएनपीपी’ या यंत्रणांद्वारे सूचनादेखील देण्यात येतात. नोव्हेंबर 2018 ते जून 2019 या कालावधीत राज्याला “मोडीस’ यंत्रणेअंतर्गत 2,516 तर “एसएनपीपी’ यंत्रणेअंतर्गत तब्बल 26,939 फायर अलर्ट म्हणजेच पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत. यावरूनच राज्यातील वनक्षेत्रातील वणव्यांची स्थिती ही चिंताजनक असून, त्याबाबत योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे, हे स्पष्ट होते.
वनविभागातर्फे वणव्यांबाबत दक्षता म्हणून जंगलात “फायर लाइन’ची आखणी करणे, पाण्याची व्यवस्था करणे, परिसरात जागरुकता निर्माण करणे असे विविध उपाय राबवले जातात. यासाठी वनसुरक्षारक्षकांना विशेष प्रशिक्षणही देण्यात येते. मात्र, अनेकदा या उपाय योजना प्रभावी ठरत नाहीत. परिणामी, वणव्याचे स्वरुप विस्तारते. अनेकदा वणव्यामुळे गंभीर प्रमाणात वनसंपदा आणि जीवितहानी झाल्याच्या घटना घडत असल्याचे वन अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.