भिगवण -सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील बागायती शेतीसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या उजनी धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. सध्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा 28.5 टक्के झाला आहे. त्यामुळे धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी आता दीड महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षा पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. धरणसाठ्यातील पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे लॉकडाऊननंतर कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे. पुणे परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी उजनी धरणालगतच्या भागात पाऊस झाल्याने उजनी धरण जुलै महिन्याच्या अखेरीस मृत पाणीसाठा ओलांडून उपयुक्त पाणीसाठा होण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. मागील आठवड्यापासून पुणे परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. धरणामध्ये बुधवार (दि.12) 79.09 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यातील 15.35 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढून 493.35 मीटर इतकी झाली आहे.
अद्यापही धरणात पाण्याचा विसर्ग होत असून दौंड येथून 5117 दक्षलक्ष घनफूट तर बंडगार्डन येथून 5399 दक्षलक्ष घनफूट पाणी धरणात येत आहे. चांगला पाऊस आणि वाढता पाणीसाठा होत असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पाण्याची शाश्वती वाटू लागल्याने शेतकऱ्यांनी दीर्घकालीन पिकांच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.
नदीकाठावरील शेतकऱ्यांना दिलासा…
भिगवण परिसरात पाचशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सुमारे दोन महिन्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. कोणतेही नुकसान न करता पोषक पाऊस झाला आहे. उन्हाळ्यातील पाण्याचा तुटवडा जाणवल्याने आणि पावसाळ्यात अडीच महिन्यांत दमदार पाऊस झाला आहे. करोनाचे संकट घोंगावले असतानाही शेतीची स्थिती भक्कम राहिली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आडसाली लागवडी झाल्या आहेत. खोडवा पिकाची वाढ चांगली झाली आहे.