चेन्नई -तामीळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापासूनच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, या मुद्द्यावरून सत्तारूढ अण्णाद्रमुकमध्ये घमासान सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या पक्षाचा चेहरा कोण ठरणार याविषयीची उत्सुकता बळावली आहे.
तामीळनाडूत 2011 पासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. जयललिता यांचे 2016 च्या अखेरीस निधन झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्याकडे सुत्रे आली. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकच्या चेहऱ्याविषयी पक्षातूनच चर्चेने जोर धरला आहे.
अण्णाद्रमुकला पुन्हा सत्ता मिळाल्यास निवडून आलेले आमदार नवा मुख्यमंत्री ठरवतील, अशी भूमिका नुकतीच तामीळनाडूतील एका मंत्र्याने मांडली. दुसऱ्या मंत्र्याने ती भूमिका खोडून काढत पलानीस्वामी यांनाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवण्यास अनुकूलता दर्शवली.
अण्णाद्रमुकच्या चेहऱ्याविषयीची चर्चा रंगू लागल्याने ती थांबवण्याच्या उद्देशातून एक ज्येष्ठ मंत्री डी.जयकुमार पुढे सरसावले. मंत्र्यांनी मांडलेली भूमिका पक्षाची भूमिका मानली जाऊ नये. अण्णाद्रमुकच्या योग्य व्यासपीठांवर पक्षाच्या चेहऱ्याविषयीचा निर्णय सलोख्याने घेतला जाईल.
अण्णाद्रमुकला पुन्हा सत्तेत आणण्याचा पक्ष कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. जाहीर मतप्रदर्शनाने त्या निर्धाराला हानी पोहचू शकते आणि विरोधकांना मुद्दा मिळू शकतो, अशा शब्दांत जयकुमार यांनी सबुरीने घेण्याचा सल्ला सहकाऱ्यांना दिला.