काही दुकानदार करताहेत दुर्लक्ष ; अशा दुकानदारांवर कारवाईची मागणी
वाघोली (प्रतिनिधी) : व्यापारी व दुकानदारांनी वाघोली येथील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतच चालू ठेवण्याबाबत सक्त सूचना ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर सायंकाळी ५ नंतर बहुतांश दुकानदार मोठा प्रतिसाद देऊन दुकाने बंद करीत आहेत. काही दुकानदार मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावरच दुकाने बंद करीत आहेत. दुर्लक्ष करणाऱ्या अशा दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
वाघोली गावामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हवेली उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व प्रकारची दुकाने सकाळी ९ ते ५ यावेळेतच चालू ठेवण्याच्या सूचना ग्रामपंचायत व लोणीकंद पोलिसांकडून वाघोलीतील व्यापारी व दुकानदारांना शुक्रवारी (दि.१९) देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती मात्र काही दुकाने चालू होती. शनिवारी (दि.२०) सायंकाळी बहुतांश दुकानदारांनी सूचनांचे पालन करून सायंकाळी पाच नंतर दुकाने बंद केली. काही दुकानदारांनी दुकाने चालू ठेवली होती. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर दुकाने बंद करण्यात आली. मेडिकल, दुध डेअरी ही अत्यावश्यक सेवेची दुकाने नियमितपणे चालू आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त सायंकाळी ५ नंतर इतर दुकाने चालू ठेवणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.