वाघोली (प्रतिनिधी) : हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई गावचे सुपुत्र रघुनाथ खंडू गावडे यांना केंद्र शासनाने आय.ए.एस. पदी पदोन्नती नुकतीच दिली आहे. त्यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली असून हवेली तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाडेबोल्हाई आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने बोल्हाई मातेच्या मंदिर परिसरात त्यांचा नियुक्ती बद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. गावातून त्यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेत त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा सत्कार केला.
“क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रावर आपला प्रभाव पाडून जनसामान्यांची सेवा करण्यासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या प्रत्येकाची ओळख ही समाजात वेगळी ठरते. जिल्हाधिकारी पदापर्यंत गावडे यांनी प्रशासकीय सेवेत जनसामान्यांची सेवा करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.”
– दत्तात्रय गोते पाटील(संस्थापक, अध्यक्ष महालक्ष्मी ग्रुप, पुणे)
आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच नातेवाईक व तरुण वर्ग या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता. ग्रामस्थांनी यावेळी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. तालुक्यातून अनेक मान्यवरांनी त्यांना नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या. वाडेबोल्हाई ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी परिश्रम घेतले.
वाडेबोल्हाई तालुका हवेली येथे महालक्ष्मी ग्रुपचे सर्वेसर्वा दत्तात्रय गोते पाटील यांच्या हस्ते देखील जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल रघुनाथ गावडे यांचा सत्कार करण्यात आला.