जिल्ह्यात अवघे 50.40 टक्के मतदान
नगर – विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांचा निरूत्साह दिसून आला. त्याबरोबर निवडणूक यंत्रणेतील चुकांचा फटका मतदारांना बसला. अनेकांची नावे गायब झाली तर बहुतांशी मतदारांची नावे दुसऱ्या तालुक्यात गेल्याने ते मतदानापासून वंचित राहिले. राजकीय पक्षादेखील मतदारापैकी न पोहचल्याने अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यात अवघे 50. 40 टक्के मतदान झाले.
निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77 महिला अशा प्रकारे 58 हजार 283 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 2 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली. तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगर शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची पहाणी केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरूवातच सस्पेन्स झाल्याने राजकीय पक्षांमधील अवमळ दिसून आला. मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणवर जिल्ह्यात झाली होती. त्याचा फायदा किमान जिल्ह्यातील उमेदवारांना होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र मतदान कमी झाल्याने आता त्याचा फायदा कोणाला होणार याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीत एकही प्रमुख राजकीय पक्षाचा उमेदवार नसल्याने अपक्ष बहुतांशी उमेदवार होते. 16 उमेदवार या निवडणुकीत आपले भवितव्या अजमावत आहे. असे असले तरी खरी लढत ही अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे व अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात झाली. अर्थात डॉ. सुधीर तांबे यांनी कॉंग्रेस उमेदवारी देऊनही निवडणुकीतून माघार घेतली. आणि सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला. तांबे यांना मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपने पाठिंबा जाहीर केला. तर पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. त्यामुळे अखेरच्या क्षणी या निवडणुकीत काहीशी चुरस निर्माण झाली. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळचे दोन तास मतदार फिरकलेच नाही.
थंडी व दाट धुके असल्याने अतिशय संथगतीने मतदान झाले. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला काहींसा वेग आला. दुपारी दोन वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या. मात्र अनेक मतदारांना निवडणूक यंत्रणेतील सावळ्या गोंधळामुळे मतदानापासून वंचित रहावे लागले. मतदान नोंदणी एका ठिकाणी केली असतांना दुसऱ्या ठिकाणीच्या मतदान केंद्रावर नावे आले. एवढेच नाही तर काही मतदारांचे तालुकेच बदलले होते. ऑनलाईन नाव दिसत असले तरी प्रत्यक्षात मतदार यादीमध्ये नाव नाही. असे प्रकार काही मतदारांबाबत घडले.