परभणी – येथे झालेल्या ६८व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुण्याच्या महिलांनी आपले निर्विवाद वर्चस्व राखले. अखेरच्या सामन्यात स्नेहल शिंदे आणि सायली केरिपाळे यांच्या अनुनभवाच्या जोरावर मुंबई शहरचा प्रतिकार ४६-२९ असा परतवून लावत पुण्याने तब्बल चौदाव्यांदा त्यांनी राज्य विजेतेपदाला गवसणी घातली आहे. २००६ पासून राज्य स्पर्धेत फक्त कराड येथील स्पर्धेत पुण्याने हार मानली आहे.
कबड्डी महर्षि बुवा साळवी क्रीडा नगरीत झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई उपगनरवर एका गुणाने मिळविलेल्या विजयाने पुण्याच्या मुलींनी जणू प्रेरित केले. यानंतरही अंतिम लढतीत मुंबई शहराने त्यांना बॅकफूटवर ठेवले होते. आठव्या मिनिटालरा पुण्यावर लोण देत मुंबई शहराने वर्चस्व राखले आणि मध्यंतराला १९-१६ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही त्यांनी तीन चार गुणांची आघाडी राखली होती.
उत्तरार्धात मात्र चित्र वेगळे दिसले. स्नेहल शिंदे आणि सायली केरिपाळे यांचा अनुभव कामी आला. या दोघींनी संघातील कुमार खेळाडूंना अतिशय योग्य पद्धतीने साथ दिली. दुसऱ्या सत्रातला पुण्याचा झंझावात मुंबई शहराला पेलवला नाही. स्नेहलने एका चढाईत तीन गुण आणल. त्यानंतर सायलीने दोन गुण घेत मुंबईवर लोण चढवला आणि पिछाडीवरून २५-२४ अशी आघाडी घेतली. ही आघाडी पुण्याने इतकी यशस्वी केली की त्यानंतर त्यांनी मुंबईला फक्त चार गुण दिले. पुण्याने मात्र लागोपाठ लोण देत २२ गुणांची कमाई केली. त्याचवेळी सायलीने एका चढाईत चार गुण टिपले आणि मुंबईला सामना आपल्या हातून गेल्याची कल्पना आली. याच दरम्यान मुंबईची पौर्णिमा जेधे जखमी झाली.
पुण्याकडून युवा कर्णधार मानसी रोडे हिच्या जरु दोन पकडी झाल्या. पण, तिने बोनस गुणांची कमाई करत आपली छाप पाडली. अंकिता जगताप, पूजा शेलार, सिद्धी मराठे आणि ऋतिका होनमाने यांनीही आपला वाटा उचलून पुण्याचा दणदणीत विजय साकार केला. मध्यंतराला पिछाडीवर राहूनही पुण्याने मिळविलेला विजय हा त्यांची जिंकण्याची मानसिकताच दाखवून देणारा होता. मुंबईच्या पौर्णिमा जाधव, श्रद्धा कदम आणि साधना विश्वकर्मा, पूजा यादव छान खेळल्या.