मुंबई – जगभरासह देशात आणि राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढताना दिसत आहे. अशातच जगभरात नवीन वर्ष आणि नाताळ साजरा होतोय. यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आणि यातूनच ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून देशातील अनेक राज्यात कोरोना संर्भातील नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे
महाराष्ट्रमध्ये राज्य सरकारने काल रात्रीपासूनच संचार बंदी लागू केली आहे. तसेच रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपें यांना राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? असे विचारले असता “राज्यात जेव्हा 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावणार”, अशा स्पष्ट शब्दात आरोग्यमंत्र्यांनी लाॉकडाऊनबाबतचे संकेत दिले.
ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळेस त्यांनी विविध मुद्द्यांवरुन प्रतिक्रिया दिली. याव्यतिरिक्त “एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीच्या उद्देशाने निर्बंध लागू करण्यात आले आहेत”,असं आरोग्यमंत्री म्हणाले.
राज्यात ओमायक्रॉन दुपट्टीने वाढतोय !
राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार दुप्पट वेगाने होतोय. त्यामुळे सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. ओमायक्रॉनसाठी ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. आम्हाला आणखी कडक निर्बंध लावण्याची, लादण्याची इच्छा नाही, गरज नाही”, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील लसवंतांची टक्केवारी !
“राज्यात कोरोना लसीचा पहिला डोस हा 87 टक्के लोकांनी घेतला आहे. तर दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची टक्केवारी ही 57 टक्के आहे”, असं टोपे यांनी सांगितलं.