माधव विद्वांस
“सरस्वतीचंद्र’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1855 रोजी गुजरातमधील नाडियाड जवळील वडनगर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील बुद्धिवर्धक गुजराती शाळा व नाडियाड येथील शासकीय इंग्रजी शाळेतून झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून ते मॅट्रिक झाले. त्याच वर्षी त्यांनी बीए पदवी मिळविण्यासाठी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला व बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यानंतर ते 1879 ते 1883 या कालावधीमध्ये भावनगर येथे राहिले. वर्ष 1883 मध्ये ते एलएलबी झाले आणि त्यांनी 1884 मध्ये मुंबईत आपला वकिली व्यवसाय सुरू केला.
वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी भरभराटीत असलेला वकिली व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःस साहित्यसेवेस वाहून घेतले. त्यांनी संस्कृती चिंतन व साहित्यसेवा यात आपले जीवन व्यतीत केले. शिक्षण घेत असताना संस्कृताध्ययन, रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांनी केलेली धर्मजागृती, राष्ट्रीय आंदोलनामुळे निर्माण झालेली राष्ट्रीय अस्मिता या गोष्टीकडे ते आकर्षित झाले. वर्ष 1868 मध्ये गोवर्धनराम यांचा हरिलक्ष्मी यांच्याबरोबर विवाह झाला. मात्र त्यांच्या निधनानंतर वर्ष 1876 मध्ये ललितागौरी यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. त्यांना तीन मुली व एक मुलगा झाला.
वर्ष 1875 मध्ये त्यांनी फ्रेंडली सोसायटीमध्ये आधी “अ रूड आउटलाइन ऑफ जनरल फीचर्स ऑफ प्रॅक्टिकल अँसेसिटीझम इन माय सेन्स ऑफ द वर्ल्ड’, हा एक पेपर वाचला. यावर गुजराती समीक्षक बलवंत्राई ठाकोर यांच्या मते, हा पेपर गोवर्धनरामांच्या विचारधारा, आकांक्षा आणि चारित्र्याचा मुख्य आधार मानला जाऊ शकतो.
गुजराती व भारतीय भाषांमध्ये साहित्यात अढळ स्थान प्राप्त करणारी वर्ष 1887 मध्ये त्यांची “सरस्वतीचंद्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ही कादंबारी युगप्रवर्तक मानली जाते. तीन हजार पाने आणि चार भागांत ही कादंबरी आहे. ही कादंबरी त्यांनी सरस्वतीचंद्र व कुमुदसुंदरी यांचे प्रणय कथेवर आधारित लिहिली असून धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या पुरुषार्थांचे दर्शन घडविते. या कादंबरीचे मराठीसह 15 भाषांमध्ये भाषांतर झाले.
या कादंबरीवर आधारित “सरस्वतीचंद्र’ हा हिंदी चित्रपट वर्ष 1968 मध्ये गोविंद सरैय्या यांनी दिग्दर्शित केला. यामध्ये नूतन आणि मनीष हे मुख्य कलाकार होते. यातील गीते इंदीवर यांनी लिहिली व कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिले, तर लता मंगेशकर व मुकेश यांच्या आवाजामुळे हा सिनेमा खूप गाजला.
वर्ष 1889 मध्ये “स्नेहमुद्रा’ हे प्रदीर्घ काव्य लिहिले. हे काव्य त्यांच्या पत्नीच्या मृत्यूच्या घटनेवर आधारित होते. वर्ष 1902 मध्ये त्यांनी भारतीय कॉंग्रेसमध्ये सक्रिय भूमिका घेतली. तसेच वर्ष 1905 मध्ये ते गुजराती साहित्य परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले. “वसंत’ आणि “समलोचक’ या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विविध लेख आणि निबंध लिहिले.
या लेखांचे नंतर पुस्तकही प्रकाशित झाले. 1905 मध्ये “लीलावती जीवनकला’ ही त्यांच्या कन्येच्या निधनानंतर वात्सल्यभावाने लिहिलेली जीवनकथा. सहृदयी भावविश्वात रमणारे गोवर्धनराम त्रिपाठी यांचे मुंबई येथे 4 जानेवारी 1907 रोजी निधन झाले.