नवी दिल्ली -स्टिंग ऑपरेशनमुळे निवड समितीच्या अध्यक्षपदाचा चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यामुळे या जागेवर भारताचा माजी आक्रमक फलंदाज व कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याची नियुक्ती होण्यार असल्याची चर्चा बीसीसीआयच्या वर्तुळात सुरु आहे.
शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय खेळाडू आणि संघ निवडीबाबत गोपनीय माहिती देत स्वतःचेच नुकसान करुन घेतले होते. त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. सध्या निवड समितीचे अध्यक्षपद उत्तर विभागाकडे आहे.
या विभागातून आता शर्मा यांच्या जागेवर येण्यासाठी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्यात चुरस होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बाकी खेळाडूंपेक्षा सेहवागचा दावा भक्कम मानला जात आहे.
नियमांनुसार बीसीसीआय एकूण पाच सदस्यांची निवड समिती नियुक्त करते. त्यापैकी ज्याने सर्वाधिक सामने खेळले आहेत, त्याला समितीचे अध्यक्ष बनवले जाते. सध्या शिव सुंदर दास हे अंतरिम अध्यक्ष आहेत. यावेळी निवड समितीमध्ये उत्तर विभागातून केवळ सेहवाग यांचेच नाव समोर येत आहे.
प्रशासकांच्या समितीच्या कार्यकाळात सेहवागला मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले गेले होते, मात्र, त्याने नकार दिला होता. त्यामुले प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी मात्र निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी ते स्वतः अर्ज करतील असे सांगितले जात आहे.
गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग हे देखील उत्तर भागातील आहेत पण क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्षे पूर्ण होणे आवश्यक असल्याचा निकष ते पूर्ण करत नसल्याने सेहवागचाच दावा भक्कम मानला जात आहे. देशात असे अनेक क्रिकेटपटू आहेत की ज्यांना निवड समितीचे अध्यक्ष व्हायचे आहे.
मात्र, कमी मानधनामुळे ते इच्छा दर्शवत नाहीत. निवड समितीच्या अध्यक्षांना वर्षाला 1 कोटी रुपये तर इतर चार सदस्यांना 90 लाख रुपये मिळतात. दिलीप वेंगसरकर (2006 ते 2008) आणि कृष्णमाचारी श्रीकांत (2008 ते 2012) हे माजी क्रिकेटपटू निवड समितीचे प्रमुख होते. श्रीकांत यांच्या नियूुक्तीपासून बीसीसीआयने निवड समितीस मानधन देण्यास सुरुवात केली. वेंगसरकर हे मानद म्हणून कार्यरत होते.