नवी दिल्ली – विराट कोहली याला एकदिवसीय संघाचे नेतृत्व स्वतःहून सोडण्याची संधी बीसीसीआयने दिली होती. मात्र, त्याने नकार दिल्यावर चक्क हकालपट्टी करण्यात आल्याचे संकेत बीसीसीआयच्या सूत्रांनी दिले. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला एकदाही आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही, तसेच त्याचा रागीट स्वभाव व मैदानावर सातत्याने होत असलेले गैरवर्तनही त्याला भोवल्याचे सांगितले जात आहे.
कोहलीने कर्णधारपदी असताना संघातील वरिष्ठ सहकारी खेळाडूंशीही संबंध चांगले प्रस्थापित केले नव्हते. तसेच ड्रेसिंगरूममध्येही त्याने अनेकदा अशा खेळाडूंचा अपमानही केला होता. याबाबत खुद्द रवीचंद्रन अश्विननेही बीसीसीआयकडे तक्रार केली होती, असेही सांगितले जात आहे. त्यातच वर्कलोड कमी करण्यासाठी कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडले होते. तेव्हा मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी एकाच खेळाडूकडे कर्णधारपद असावे हा विचार करूनच बीसीसीआयने एकदिवसीय संघाचे नेतृत्व स्वतःहून सोडण्याचा पर्याय कोहलीला दिला होता. त्याने यासाठी नकार दिल्यावर बीसीसीआयने थेट कठोर निर्णय घेत त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले व रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवली.
आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत यंदा भारतीय संघ प्लेऑफ गटातही स्थान मिळवू शकला नव्हता, तेव्हाच कोहलीकडून नेतृत्व काढून घेतले जाणार असेच चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे आता कसोटी संघाचे नेतृत्व कोहलीकडेच राहिले असले तरी मर्यादित षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व रोहितकडेच 2023 सालापर्यंत राहील, असेही बीसीसीआयने जाहीर केले.
आयसीसीकडूनही स्वागत
भारताच्या एकदिवसीय व टी-20 संघांचे नेतृत्व रोहितकडे सोपवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे खुद्द आयसीसीनेही स्वागत केले आहे. तसेच जागतिक क्रिकेटमधील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू व समालोचकांनीही बीसीसीआयचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले असून, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी नव्या युगाची सुरुवात असल्याचेही मत व्यक्तकेले जात आहे.