राजकोट – कर्णधार व सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्या सलग दुसऱ्या शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी सलग दुसरा विजय मिळवताना छत्तीसगडवर 8 गडी राखून मात केली.
कर्णधार ऋतुराजने नाणेफेक जिंकत छत्तीसगडला प्रथम फलंदाजी दिली. मुकेश चौधरी व राहुल त्रिपाठी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांची एकवेळ 4 बाद 69 अशी बिकट स्थिती बनली होती. त्याचवेळी अमनदीप खरेने 82, तर शशांक सिंगने 63 धावांची खेळी केली. त्यांना अशुतोष सिंग, अजय मंडल व शुभम आग्रवाल यांनी थोडीफार साथ केल्यामुळे छत्तीसगडने 50 षटकांत 7 गडी गमावून 275 धावा केल्या. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीने 4, तर राहुल त्रिपाठीने 2 गडी बाद केले.
महाराष्ट्राने विजयासाठी आवश्यक 276 धावा 47 व्या षटकात 2 गडी गमावून पूर्ण करत सलग दुसरा विजय नोंदवला. महाराष्ट्राच्या डावाची सुरुवात पहिल्या सामन्याप्रमाणेच थाटात झाली. कर्णधार ऋतुराजने यश नहारच्या साथीत संघाला 120 धावांची सलामी दिली. नहारला पहिल्या सामन्यात अर्धशतक फटकावता आले नव्हते. ती कसर त्याने या सामन्यात भरून काढताना 61 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावताना 52 धावांची खेळी केली.
दरम्यान, ऋतुराजनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. नहार बाद झाल्यावर नौशाद शेखनेही ऋतुराजला सुरेख साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. नौशादने 37 धावांची खेळी केली व संघाचे द्विशतकही फलकावर लावले. तो चांगला खेळत असताना बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या राहुल त्रिपाठीने ऋतुराजच्या साथीत संघाचा विजय साकार केला.
ऋतुराजने या स्पर्धेतील यंदाच्या मोसमातील सलग दुसरे शतक साकार केले. केवळ शतकावर त्याचे समाधान झाले नाही, तर त्याने नाबाद दीडशतकी खेळी केली. त्याने नाबाद 154 धावांच्या खेळीत 143 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार व 5 षटकारांची बरसात केली. त्रिपाठी 23 धावांवर नाबाद राहिला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 60 धावांची अखंडित भागीदारी केली. छत्तीसगडकडून अजय मंडलने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – छत्तीसगड – 50 षटकांत 7 बाद 275 धावा. (अमनदीप खरे 82, शशांक सिंग 63, मुकेश चौधरी 4-67, राहुल त्रिपाठी 2-25). महाराष्ट्र – 47 षटकांत 2 बाद 276 धावा. (यश नहार 52, नौशाद शेख 37, ऋतुराज गायकवाड नाबाद 154, राहुल त्रिपाठी नाबाद 23, अजय मंडल 2-47).