मुंबई – भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यामुळेच विराट कोहलीला एकदिवसीय संघाचे नेतृत्वही गमवावे लागले, असे आता समोर येत आहे. एकप्रकारे बीसीसीआयची विनंती फेटाळून कोहलीने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे मत बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले.
बीसीसीआयने कोहलीला टी-20 संघाचे नेतृत्व सोडू नकोस. काही काळ विश्रांती हवी असेल तर ती घे, असे पर्याय दिले होते. मात्र, केवळ माध्यमांकडेच आपली मते व्यक्त करत वर्कलोडवर सातत्याने मते मांडताना कोहलीने थेट बीसीसीआयशीच पंगा घेतला व त्यामुळेच त्याला आता पाठोपाठ फटके बसत आहेत, असेही या सुत्राने सांगितले.
बीसीसीआय व निवड समितीने टी-20 व एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्माला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. बीसीसीआयने कोहलीला टी-20 संघाचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती.
मात्र, कोहलीने आपला हेका सोडला नाही म्हणून रोहितबाबत निर्णय घेतला गेला. तसेही मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी दोन वेगळे कर्णधार ठेवणेही योग्य नव्हते,असा खुलासाही या सदस्याने केला आहे.