चेन्नई – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून 227 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लंडने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताला हा सामना जिंकण्यासाठी 420 धावांची गरज होती. कर्णधार कोहली व शुभमन गिल यांची अर्धशतकी खेळी वगळता अन्य एकाही फलंदाजाला यश आले नाही. पाचव्या दिवशी फिरकीला साथ देत असलेल्या खेळपट्टीवर जॅक लीचने टाकलेली गोलंदाजी व वेगाला कोणतीही मदत न होताही जेम्स ऍण्डरसनने केलेले रिव्हर्स स्विंग भारतीय फलंदाजांना उमगलेच नाहीत.
ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर शानदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा 227 धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा सुमार कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव केवळ 192 धावांत संपुष्टात आला. याच दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना याच मैदानावर येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे.
मंगळवारी अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 381 धावा तर, इंग्लंडला 9 बळींची गरज होती. सोमवारी रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा यांनी पाचव्या दिवशी भारताच्या डावाची सुरूवात केली. जॅक लीचने पुजाराला 16 धावांवर बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर गिलने वेगाने खेळ करत सलग तिसऱ्या कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर जेम्स ऍण्डरसनने त्याचा त्रिफळा उडवला.
गिल बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानावर होते. गिलला बाद केल्यानंतरच्या दुसऱ्याच षटकांत ऍण्डरसनने रहाणेचाही त्रिफळा उडवला. हे दोन्ही बळी ऍण्डरसनच्या अफलातून रिव्हर्स स्विंगचे प्रदर्शन ठरले. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 4 बाद 92 अशी झाली होती.
रहाणेच्या जागी आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडून ऑस्ट्रेलियातील सिडनी व ब्रिस्बेन प्रमाणे या कसोटीत पहिल्या डावात केलेल्या खेळीच्याच पुनरावृत्तीची अपेक्षा होती. पण त्यालादेखील ऍण्डरसनने 11 धावांवर बाद केले. 110 वर भारताचा निम्मा संघ परतला होता. ऑस्ट्रेलियातील चौथ्या आणि या कसोटीतील पहिल्या डावात अर्धशतक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला डोमिनिक बेसने शून्यावर बाद केले. सुंदर बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 6 बाद 117 अशी झाली.
त्या वेळी खेळपट्टीवर कोहली व रवीचंद्रन अश्विन होते. या दोघांनी संघाला 171 धावसंख्येपर्यंत आणले. त्याच वेळी लीचने अश्विनला बाद केले आणि भारताला सातवा धक्का दिला. त्यानंतर कोहलीने कसोटीतील 24 वे अर्धशतक फटकावले. कोहली व शाहबाज नदीम किती वेळ मैदानावर थांबतात याची उत्सुकता होती. पण स्टोक्सने कोहलीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नदीमला लीचने तर, जोफ्रा आर्चरने जसप्रीत बुमराहला बाद करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडकडून लीचने सर्वाधिक 4, ऍण्डरसनने 3 गडी बाद केले. तर, स्टोक्स, आर्चर व बेस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक :-
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 578 धावा. भारत पहिला डाव – सर्वबाद 337 धावा. इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद 178 धावा. भारत दुसरा डाव – 58.1 षटकांत सर्वबाद 192 धावा. (विराट कोहली 72, शुभमन गिल 50, चेतेश्वर पुजारा 15, जॅक लिच 4-76, जेम्स ऍण्डरसन 3-17, बेन स्टोक्स 1-13, जोफ्रा आर्चर 1-23, डॉमनिक बेस 1-50).