नवी दिल्ली- केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करणारे खासगी विधेयक लोकसभेत सादर केले जाणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसचे पंजाबमधील खासदार पुढाकार घेणार आहेत.
कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना खासगी विधेयकाबाबतची माहिती दिली. शेतकऱ्यांविषयी सहानुभूती असणाऱ्या इतर पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. राज्यसभेत तशाच प्रकारचे खासगी विधेयक मांडण्याची विनंती आम्ही त्या सभागृहातील सदस्यांना करू, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे संसदेत मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेस सरसावल्याचे मानले जात आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी सुमारे अडीच महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर, पंजाबमधील कॉंग्रेस खासदारांची कृती महत्वाची ठरणार आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत कॉंग्रेसनेही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे.