मुंबई – एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंधांच्या प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. नवलखा यांचा जामीन अर्ज पूर्वी विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. त्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची कोणतेही कारण आढळत नसल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले.
पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार पर्षदेमध्ये काही कार्यकर्त्यांनी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. एल्गार परिषदेला माओवाद्यांचा पाठिंबा होता, असा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयानेच गेल्या वर्षी नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
अटकेनंतर 90 दिवस कोठडीत असल्यानंतरही आरोपपत्र दाखल न झाल्याने जामीन मिळावा, अशी याचिकाही नवलखा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयात सादर केली आहे. या अर्जावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. ‘एनआयए’ने आरोपपत्र दाखल करण्यासाठी वाढीव मुदतीची मागणी केली आहे.