नवी दिल्ली -विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या उत्तरप्रदेश आणि पंजाबमधील भाजपच्या अनेक नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ते पाऊल उचलले.
व्हीआयपी सुरक्षा मिळालेल्या उत्तरप्रदेश आणि पंजाबमधील नेत्यांमध्ये काही उमेदवारांचाही समावेश आहे. संबंधित नेते आणि उमेदवारांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलांचे सशस्त्र कमांडो तैनात असतील. केंद्रीय मंत्री एस.पी.एस.बघेल आणि खासदार असणारे गायक हंसराज हंस यांना झेड दर्जाची सुरक्षा उपलब्ध करण्यात आली आहे.
बघेल हे समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विरोधात उत्तरप्रदेशच्या करहलमधून निवडणूक लढवत आहेत. बघेल यांच्या ताफ्यावर सपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यापाठोपाठ व्हीआयपी सुरक्षेविषयीची माहिती पुढे आली आहे.
सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या उमेदवारांसाठी ती निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उपलब्ध असेल. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल. तर, उत्तरप्रदेशात मतदानाचे एकूण सात टप्पे होणार आहेत. त्या राज्यात अखेरच्या टप्प्यासाठी 10 मार्चला मतदान होईल.