वॉशिंग्टन – लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेला हिंसाचार हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर झाला आहे, अशा दावा अमेरिकेच्या “न्यूजवीक’ या वृत्तपत्राने केला आहे. तसेच या संघर्षात चीनचे 40 ते 50 नव्हे तर 60 सैनिक ठार झाल्याचाही उल्लेख केला आहे.
“न्यूजवीक’च्या वृत्तात इशारा देताना म्हटले की, चीन आपल्या अपयशामुळे अधिक अस्वस्थ झाला आहे, यामुळे याचे विपरित परिणाम होऊ शकतात. या पराजयामुळे अस्वस्थ झालेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताविरोधात मोठे पाऊल उचलण्यास तयार आहेत. त्यामुळे येत्या काळात सीमेवर तणावाची परिस्थिती अधिक वाढू शकते.
नोव्हेंबर 2012 मध्ये शी जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस बनल्यापासून भारताशी जोडलेल्या सीमेवर चिनी सैनिकांची आक्रमकता वाढली आहे. जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पार्टीचे सेंट्रल मिलिट्री कमिशनचे अध्यक्ष आणि पक्षाचे सरचिटणीस देखील आहेत. भारत आणि चीन दरम्यान सीमानिश्चित झालेली नाही, त्यामुळे याचाच फायदा चिनी सैनिक घुसखोरीसाठी घेतात.
फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसीजचे क्लिओ पास्कलच्या हवाल्याने न्यूजवीकने म्हटलंय की, रशियानं मे महिन्यांतच चीनच्या हरकतींबाबत भारताला इशारा दिला होता. रशियाच्या माहितीनुसार, चीन तिबेटच्या भागात पहिल्यापासूनच युद्ध सराव करीत होता.
त्यामुळेच जेंव्हा गलवान खोऱ्यात 15 जून रोजी संघर्ष निर्माण झाला तेव्हा भारताला आश्चर्याचा धक्का बसला. हा संघर्ष जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन देशांमध्ये झालेला 45 वर्षातील पहिला संघर्ष होता.