रवींद्र कदम
तीन महिने उलटूनही 19 बसेसची प्रतीक्षा : ठेकेदाराला महानगरपालिकेचा अल्टिमेटम
नगर – महापालिकेकडून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शहरात दीपाली ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून बस सेवा सुरु करण्यात आली आहे. सुरुवातील 15 ते 30 बस दीपाली ट्रान्सपोर्ट कडून, सुरु करण्यात येणार असल्याचे करारात म्हटले होते. मात्र, शहरात फक्त 11 बसेस सुरु आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढविण्यासाठी मनपाकडून अनेकदा पत्रव्यवहार करूनही दीपाली ट्रान्सपोर्ट दुर्लक्ष करत असल्याने मनपाचा करारा भंग केला असल्याचे बोलले जात आहे.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना शहरात अंतर्गत प्रवासासाठी दीपाली ट्रान्सपोर्ट च्यावतीने बस सेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये मनपा व दीपाली ट्रान्सपोर्ट यांच्यात 10 वर्षांचा करार झाला आहे. या करारात ट्रान्सपोर्टकडून सुरुवातीला 15 बसेस सुरु करण्यात येणार होत्या. त्यानंतर तीन महिन्याच्या आत 30 बसेसे च्या माध्यमातून नागरिकांना सेवा दिली जाणार होती. मात्र, दीपाली ट्रान्सपोर्ट कडून शहरात सध्या 11 बसेस सुरु आहेत. त्यामुळे अनेक भागात बस सेवा पोहचत नसल्याने नागरिकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहेत.
शहरातील महत्वाच्या मंजूर मार्गावर ही बस सेवा सुरु करण्यात आली. त्यामध्ये माळीवाडा बसस्थान ते एमआयडीसी, विळद घाट, केडगाव, निर्मलनगर या भागात बस सेवा दिली जात आहे. मात्र, भिंगार, आलमगीर, नगर-कल्याण रस्ता, बोल्हेगाव, नागापूर, व्हीआरडी परिसरातील नागरिकांना अद्यापही बसेसेची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत असून अनेकांची गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी मनपाकडून दीपाली ट्रान्सपोर्ट कडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र याकडे कायमच दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.
मनपाला बस मागे दोन हजार
शहराला बससेवा पुरविण्याबाबत महापालिका व दीपाली ट्रान्सपोर्ट यांच्यात 10 वर्षांचा करार झाला आहे. यामध्ये बसेसचा मेंन्टनस, चालक हे ट्रान्सपोर्टने करायचे आहे. मनपाचा परवाना दीपाली ट्रान्सपोर्टने वापरायचा आहे. त्याबदल्यात ट्रान्सपोर्टकडून प्रति एक बस मागे मनपाला दोन हजार रुपये रॉयल्टी मिळत आहे.
बसेस वाढविण्यासाठी आयुक्तांनी घेतल्या तीन बैठका
शहरात बसेसची संख्या वाढविण्यासाठी आयुक्तांनी तीन बैठका घेतल्या आहेत. मात्र दीपाली ट्रान्सपोर्टकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दीपाली ट्रान्सपोर्टकडून बसेसच्या संख्येत वाढ होती का नाही. याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. शहरातील भिंगार, आलमगीर, बोल्हेगाव, व्हीआरडी परिसरातील नागरिकांना आनखी किती दिवस बसची प्रतीक्षा करावी लागणार आहे.