राजगुरूनगर (प्रतिनिधी) – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पक्षातील भगवान पोखरकर या चुकीचा माणसाच्या पाठीमागे उभे राहिले, या भगवानचे कौतुक केले, पक्षही त्यांच्या पाठीमागे उभा राहिला याचा खेद वाटतो. भांडणे लावणाऱ्या आढळरावांना तालुका पुन्हा स्वीकारणार नाही, अशी कडवट टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली.
खेड पंचायत पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनतर झालेल्या स्वागत सभेत मोहिते पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, अरुण चांभारे, शांताराम सोनवणे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, माजी सभापती रामदास ठाकुर, सुरेश शिंदे, कैलासराव सांडभोर, राजाराम लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर, माजी सभापती अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, सुनीता सांडभोर, रुपाली जाधव, वैशाली गव्हाणे, अमर कांबळे, नंदा सुकाळे, मंदा शिंदे यांसह शिवसेनेचे बंडखोर सदस्य यावेळी उपस्थित होते.
“आमचा पक्षाला विरोध नव्हता तर पोखरकर या व्यक्तीला होता. 101 दिवस या प्रक्रियेत गेला याकाळात राहिलेली कामे नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील. विकासाला अधीन राहून सभापती अरुण चौधरी याना साथ देऊन वनागरिकाचे प्रश्न सोडवू विकास कामे मार्गी लावू.
– अंकुश राक्षे, माजी सभापती, शिवसेना
पोखरकरांविरोधात पोलिसांमध्ये फिर्याद देणार
भगवान पोखरकर हा चारित्र्यहीन व्यक्ती आहे. महिलांचा विनयभंग केला त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आताही अल्पवयीन मुलीशी लगड केले आम्हालाही अल्पवयीन मुलांकडून जीवे मारण्याचा प्लॅन रचला आहे या विरोधात पोलिसांमध्ये फिर्याद देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर सभेत सांगितले.
“गेली 101 दिवसांचा तालुक्यातील विकास कामना बसलेला खोडा आगामी काळात भरून काढला जाईल. आमदार मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सदस्यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील.
– अरुण चौधरी, नवनिर्वाचित सभापती, खेड पंचायत समिती
…तर पोखरकरांच्या विरोधात मतदान?
सभापती निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने राजगुरूनगर शहरात विविध ठिकाणी फटाके लावुन जल्लोष करण्यात आला. स्वागत सभेला शिवसेनेचे माजी सभापती अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, सुनीता सांडभोर, रुपाली जाधव, अमर कांबळे उपस्थित होते. निवडणूक झाली असती तरी या सदस्यांनी पोखरकर यांच्या विरोधात मतदान केले असते अशी परिथिती होती.