औंध – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या बांधवांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वर वाडी, सुस, महाळूंगे परिसरातील सर्व समाजाच्या बांधवांनी एकत्रित येऊन मराठा समाजाच्या बांधवांना आरक्षण मिळावे अशी मागणी केली.
यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिसरातील गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज दिवाळी साजरी करणार नाही. आरक्षणासाठी जीव गमावलेल्या बांधवांचा विचार करून तसेच मनोज जरंगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने दिवाळी साजरी करू नये असे जाहीर करण्यात आले.
सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे, बोपोडी, बावधन, बहिरटवाडी, खैरेवाडी, गोखले नगर, जनवाडी, माॅडेल काॅलनी, भोसले नगर, वाकडेवाडी, मुळा रोड, पाटील इस्टेट भैया वाडी, छत्रपती शिवाजी महाराज नगर, रेल्वे झोपडपट्टी संगमवाडी, भोसले वाडी, पाटकर प्लाॅट वडारवाडी, पांडवनगर, संपुर्ण छत्रपती शिवाजी महाराज नगर भाग, पी एम सी काॅलनी आदी परिसरातील मराठा समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मनोज जरंगे पाटीलांच्या उपोषणाला यावेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी मराठा बांधवांनी आपले विचार व्यक्त केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. या उलट मराठ्यांचे शांततेने सुरु असलेली आंदोलने भरकटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणारी आश्वासने देण्यापेक्षा मराठा आरक्षण जाहीर करा. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी गंभीर निर्णय घेण्यात यावे. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी मराठा समाजाचे बांधव, महिला भगिनी तसेच परिसरातील सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते.