नगर -अघोरी विद्येचा वापर करुन म्हणे पैशांचा पाऊस पाडणार. त्यात एका लहान मुलाचा बळी देणार, अशी वार्ता गावभर पसरली. सरपंच यांच्यासह अख्खा गाव त्याबद्दल जाब विचारण्यासाठी लोटला. त्यातून रात्री उशिरा 4 पुरुष, 1 महिला अन् लहान मुल ग्रामस्थांनीच पोलिसांना ताब्यात दिले. अखेरीस पहाटेच्या सुमारास प्रेमाच्या चौकोनाचे बिंग फुटले. अन् रात्री अघोरी विद्येच्या संशयाने घाबरुन श्वास रोखलेले ग्रामस्थ सकाळी ड्रामा उघड होताच हास्यकल्लोळात बुडाले.
विळद (ता. नगर) येथे काल रात्री ही घटना घडली. गावात बाहेरुन कोणीतरी चार ते पाच इसम आल्याचे समजल्याने ग्रामसेवक सागर खळेकर एका वस्तीवर पोचले. तिथे चार पुरुष, एक महिला व एक लहान मुल आढळून आले. खळेकर यांनी त्यांच्याकडे चौकशी सुरु केली. तथापि, खळेकर यांना त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या माहितीत विसंगती आढळत गेली. त्यामुळे खळेकर यांना संशय आला. त्यांनी घरात डोकावून पाहिले. त्यावेळी घरात एक खड्डा खणलेला होता. तिथेच जवळच एक लहान मुल झोपलेले होते. अन् जवळच काही हळदी-कूंकू लावलेली अंडी होती.
हे दृष्य पाहून खळेकर यांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्यांनीं तत्काळ याची माहिती सरपंच व ग्रामस्थांना देऊन घटनास्थळी पाचारण केले. तथापि, ग्रामस्थांनाही उपस्थित पुरुष व महिला काहीच थांगपत्ता लागू देत नव्हते. परिणामी संशय बळावल्याने एमआयडीसी पोलिसांना याची खबर देण्यात आली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी पोचले. त्यांनी ते महाराज, अन्य तिघे जण, ती महिला व लहान मुल ताब्यात घेतले अन् पोलिस ठाणे गाठले.
त्यांना पोलीसी खाक्या दाखविला. तेव्हा कुठे पहाटे ते सर्वजण बोलायला लागले. त्यात जी महिला उपस्थित होती. ती अगोदर एमआयडीसीमधील एका उद्योजकाच्या खासगी मालमत्तेत राहत होती. मात्र, लॉकडाऊनमुळे तिला गाशा गुंडाळावा लागला. नवरा मद्यपि असल्याने तो सोडून दिल्याचे तिने सांगितले. पुण्यात दुसऱ्या प्रियकराशी सूत जुळले. मात्र, तोही नंतर नकोसा झाला. अन् बीडमधील तिसऱ्याशी सूत जुळले. बीडमधील तिसऱ्याशी लग्नगाठ बांधायची होती. त्यात काही अडथळा नको म्हणून तिने केकताई येथील महाराजाकडून मंत्रोच्चारात बीडमधील प्रियकराच्या अंगावरुन ही अंडी उतरवली.
दरम्यान, बीडच्या तरुणाशी लग्नगाठ बांधली जात असल्याचे लक्षात आल्याने पुण्याचा प्रियकर लॉकडाऊनची बंधने तोडत विळदला पोचला होता. तिथे महाराजही उपस्थित असल्याने संशय वाढला. वास्तविक हा महाराज तेथे एका उद्योजकानेच आणून ठेवलेला आहे. त्या उद्योजकाला मटक्याचा नाद आहे. त्याचे आकडे हा महाराज काढून देतो. म्हणून त्याला उद्योजकानेच वस्तीवर आणले होते. तिथे या महाराजाची ओळख झाल्यानंतर त्या महिलेस अंडी उतरवरून टाकण्याचा नवा फंडा मिळाला.
दरम्यान, या प्रयोगाविषयी “पैशांचा पाऊस पडणार’ असल्याची अफवा गावभर परसली. त्यातनू घोळ वाढत गेले.
या संबंधित घटनेतील पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर 188 नुसार गुन्हे दाखल करून, त्यातील दोघांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, नरबळीचा कुठलाही प्रकार नाही.
पवन सुपनर , पोलीस उपनिरीक्षक (एमआयडीसी पोलीस ठाणे)