कोपरगाव – माझा पराभव माझ्या विरोधकांकडून झाला नाही, तर कटकारस्थानातून झाला आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझा पराभव करण्यासाठी त्यांचे मेव्हणे राजेश परजणे यांना विरोधात अपक्ष उभे करून मला पडणारे मते जीरवली व फिरविली, असा आरोप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
शुक्रवारी मुंबई येथे नगर जिल्ह्यातील भाजपचे पराभूत आमदारांची बैठक राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांच्या समक्ष भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी घेतली. यावेळी खुलेआम विखे पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले. यावेळी कोल्हे म्हणाल्या, विखे पाटील यांचे कोपरगाव तालुक्यासाठी काय योगदान आहे. ते कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याला आडवे आले, हे योगदान आहे का? का फक्त मेव्हण्याचे भले करायचे हे योगदान आहे. आम्ही आमच्या पद्धतीने पराभूत झालो असतो, तर गोष्ट वेगळी आहे.
आमचा मतदार ठरवेल निवडून कोणाला द्यायचे ते. पण विखेंनी आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ करायचे काय कारण. आम्ही त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालत नाही, तर मग विखेंनी दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवू नये. माझी मते कमी झाली नसती. माझे काम बोलत होते. मात्र ते विकासकामे पूर्णा करण्याच्या नादात केलेले कामे सांगण्यात मी कमी पडले. पण विखेंनी त्यात अधिक भर टाकत मला पडणारी मते फिरवली.
विखे यांनी भाजपच्या उमेदवारांना अपेक्षित मदत केली नाही. ते भाजपमध्ये येऊन पक्षाला काय फायदा झाला. विखे भाजपमध्ये नसताना आम्ही 5 आमदार निवडून आलो होतो. मग ते पक्षात आल्यानंतर असा काय फायदा झाला. उलट नुकसानच झाले. केवळ चारशे मताच्या फरकाने माझा पराभव होणे माझ्या जिव्हारी लागले आहे.
पक्षश्रेष्ठींनी आमचे म्हणणे ऐकूण घेतले. विखेंनी त्यांची चूक कबूल केली, तरी आमची गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. कोपरगाव मतदारसंघाचे विखे यांच्या भूमिकेमुळे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. विखे नसते तर मी 400 मते कसेही मिळविले असते. मी मतदार संघासाठी पाच वर्षांत रक्त आटवले. मतदार संघातील विकास कामांसाठी अनेक कार्यालयांच्या पायऱ्या झिजवल्या. म्हणूनच कोट्यवधी रुपयांचा निधी आणू शकले. विद्यमान आमदारांनी पाच वर्षांत माझ्यापेक्षा एक रुपया जास्तीचा निधी आणून दाखवावा, असेही कोल्हे म्हणाल्या.